कोरोनाचे नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवत आहे - राज ठाकरे

कोरोनाचे नाव पुढे करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत आहे, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. 

Updated: Mar 12, 2020, 07:43 AM IST
कोरोनाचे नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवत आहे - राज ठाकरे title=
Pic Courtesy: twitter @mnsadhikrut

औरंगाबाद : कोरोनाचे नाव पुढे करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत आहे, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज्यात कोणी दगावले नसताना १४४ कलम कशासाठी लावले, असा सवालही राज यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात एकही जण कोरोनामुळे दगावलेला नसताना नाशिकमध्ये कलम १४४ कशासाठी लावले, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. दरवर्षी महाराष्ट्रात दीड लाख लोक टीबीने मरतात. त्याचे काही नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार असून शिवपूजन देखील केले जाणार आहे. या कार्यक्रमाला अजून प्रशासनाकडून परवानगी मिळाली नसली तरी परवानगी मिळेल, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अकरावर गेल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठारेंनी दिली. पुण्यात आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सात रुग्णांपैकी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता मुंबईतही कोरोनाचे रुग्ण असल्याचे पुढे आले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशन लवकर  गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी किंवा रविवारपर्यंत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत अधिवेशन संपवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.

0