'काँग्रेसला ६० वर्षात जमलं नाही ते ५ वर्षात केलं'

काँग्रेसने ६० वर्षात जो विकास केला नाही तो भाजपा सरकारनं पाच वर्षांत केलाय.

Updated: Jan 20, 2019, 07:11 PM IST
'काँग्रेसला ६० वर्षात जमलं नाही ते ५ वर्षात केलं' title=

नागपूर : काँग्रेसने ६० वर्षात जो विकास केला नाही तो भाजपा सरकारनं पाच वर्षांत केलाय. काँग्रेसने केवळ स्वत:चा विकास केला, असा घणाघाती हल्लाबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प सभेला नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. गडकरींनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या योजनांचा पाढा वाचला.

आम्ही संविधान मोडणार असा अपप्रचार काँग्रेसकडून सतत केला जातो. पण आम्ही संविधान मोडणार नाही, तर संविधानाचा वापर करून गरिब, वंचितांना न्याय मिळवून देऊ, असं गडकरी त्यांच्या भाषणात म्हणाले.

दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देण्याच्या मानसिकतेत  तत्कालिन काँग्रेस सरकार नव्हतं असा सनसनाटी आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.  काँग्रेस सरकार फक्त घोषणा करत होतं. दुसरीकडं भाजपा सरकार मात्र कृतीवर विश्वास ठेवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. नागपुरात भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोपात ते बोलत होते.