इलेक्ट्रिक वाहनांना परमिटची गरज नाही- गडकरी

अकराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन

Updated: Nov 2, 2018, 05:59 PM IST
इलेक्ट्रिक वाहनांना परमिटची गरज नाही- गडकरी  title=

नागपूर : 'यापुढे कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना परमिटची गरज असणार नाही', अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दुचाकी,चारचाकी आणि इलेक्ट्रिक बसेस अशा सर्व विजेवर चालणाऱ्या वाहनांना परमिट राजमधून मुक्त करण्यात आलं असून तशाप्रकारचा आदेशही जारी करण्यात आल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली. तर अशा पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेची गरज असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. 

चार्जीगची गाडी 

पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांना शोधण्यात येत असून राज्य सरकार यापुढे वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारच खरेदी करणार आहे.  त्याचाच भाग सप्टेंबर महिन्यात ५ इलेक्ट्रीक कार सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या इलेक्ट्रीक कारमधून फेरी मारली.

डीसी किंवा एसी करंटवर या गाड्या चार्ज करता येणार आहेत. मंत्रालयात तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन ठेवण्यात आलं आहे.

कामगिरी पाहणार

 एकदा कारची बॅटरी चार्ज केल्यावर १२० किमी अंतर पार करू शकेल. सहा महिने या गाड्यांची कामगिरी पाहिली जाणार आहे.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी १४ गाड्या घेणार आहे. येत्या वर्षभरात १००० गाड्या शासकीय सेवेत सामावून घेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.