महाराष्ट्रातल्या या गावात पहिल्यांदाच पोहचली वीज!

बातमी तिमिरातून तेजाकडे नेणारी... स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं झाली, तरी अगदी परवा परवापर्यंत राज्यातल्या आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोहोचली नव्हती... पण आता इतक्या वर्षांनी तिथे प्रकाशाचे किरण पोहोचले आणि सुरू झाला आनंदोत्सव...

Updated: Dec 6, 2017, 11:17 PM IST
महाराष्ट्रातल्या या गावात पहिल्यांदाच पोहचली वीज! title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : बातमी तिमिरातून तेजाकडे नेणारी... स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं झाली, तरी अगदी परवा परवापर्यंत राज्यातल्या आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोहोचली नव्हती... पण आता इतक्या वर्षांनी तिथे प्रकाशाचे किरण पोहोचले आणि सुरू झाला आनंदोत्सव...

सातपुड्याच्या कुशीत वसलेलं हे अंबापानी पाडा गाव... तीनशे लोकवस्तीच्या या पाड्यावर अगदी काल परवापर्यंत वीज पोहोचली नव्हती... आजूबाजूला संपूर्ण जंगल... जमिनीला टेकून उभारलेल्या झोपड्यांची घरं, त्यामुळे संध्याकाळ झाली की घराबाहेर पडण्याची सोय नाही... अंधारात कधी जंगली श्वापद येऊन हल्ला करेल, याचा नेम नाही... गेली कित्येक वर्षं अंधाराच्या छायेतच हे गाव जगलं... पण हे चित्र पालटायचं ठरवलं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी... त्यांच्या पुढाकारातून गावात सौरऊर्जेवरचे दिेवे बसवण्यात आलेत. अंबापानी, चारमाळी, रुईखेडा ही गावं प्रकाशानं उजळली...

पिढ्यानपिढ्या अंधारात राहिलेलं हे गाव... इतकी वर्ष महिलांनी पणती आणि मेणबत्तीच्या उजेडातच स्वयंपाक केला... पण आता दिवा लागल्यानं अख्खं घर उजळलं... रोज रात्री आठ ते दहा या वेळात इथल्या आदिवासींना वीज वापरायला मिळणार आहे. पाड्यावर पहिल्यांदाच वीज पोहोचली होती..... त्याचा आनंद आदिवासींच्या पारंपारिक लोककलेतून व्यक्त झालेला दिसला.