गणेशविसर्जनाला गालबोट, नाशिक जिल्ह्यातील तिघांसह राज्यात आठ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी पाचजण बुडाले. तर पिंपळगाव बसवंत येथे गणेश विसर्जन करताना तिघे बुडाल्याची घटना घडली.

Updated: Sep 2, 2020, 07:13 AM IST
गणेशविसर्जनाला गालबोट, नाशिक जिल्ह्यातील तिघांसह राज्यात आठ जणांचा मृत्यू   title=

नाशिक : जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी पाचजण बुडाले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह सापडले, तर तिसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तर निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गणेश विसर्जन करताना तिघे ग्रामपंचायत कर्मचारी बुडाल्याची घटना घडली.

नाशिकरोड देवळाली गावात नरेश कोळी हा वालदेवी नदीत बुडून मृत्यू पावला. तर चेहडी पंपिंग वालदेवी दारणा नदीसंगम याठिकाणी अजिंक्य गायधनीचा बुडून मृत्यू झाला. पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत कर्मचारी रवी मोरे कादवा नदी पात्रात बुडून मृत्यू पावले.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गणेश विसर्जन करताना तिघे ग्रामपंचायत कर्मचारी बुडाल्याची घटना घडली. यापैकी रवी मोरे या एका कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांना वाचवण्यात यश आलं. ग्रामपंयाचतीनं संकलित केलेल्या गणेशमूर्ती कादवा नदीत विसर्जन करण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे पिंपळगाव बसवंत शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबईत गणेश विसर्जन साधेपणानं पार पडलं. कोरोनामुळं यंदा मिरवणुका टाळून गणेश विसर्जन झालं. एरव्ही विसर्जनावेळी गजबजलेल्या गिरगाव चौपाटीवर यंदा शुकशुकाट दिसला. गणपती बाप्पा मोरयाचा कुठंही जयघोष ऐकू आला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं घालून दिलेले नियम गणेशभक्त पाळताना दिसत होते. उत्सवी मुंबईकरांचा उत्साह कोरोनामुळं हरवल्यासारखा दिसला.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कृत्रिम तलावात बाप्पांचं विसर्जन केलं. वर्षा निवासस्थानाच्या आवारात बाप्पांच्या विसर्जनासाठी खास कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. या कृत्रिम तलावात बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.

पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. यंदा मंडपातच कृत्रिम तलाव करण्यात आला होता. तिथं मोजक्याच गणेशभक्तांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जनापूर्वी आरती झाली. त्यानंतर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.