खुर्चीसाठी सरकार चालविण्याचा प्रयत्न, एक वर्षात सरकार अपयशी - चंद्रकांत पाटील

अकृत्रिम सरकारला एक वर्ष पूर्ण झालं - चंद्रकांत पाटील

Updated: Nov 29, 2020, 01:37 PM IST
खुर्चीसाठी सरकार चालविण्याचा प्रयत्न, एक वर्षात सरकार अपयशी - चंद्रकांत पाटील title=

पुणे : चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या वर्षपूर्तीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, 'निवडणूक पूर्वी असलेली युती स्वाभाविकपणे सत्तेत यायला हवी होती.' मात्र ती आली नाही, त्यावर कुणीतरी पुस्तक ही लिहलं. मात्र कृत्रिम युती तयार झाली आणि अकृत्रिम सरकारला एक वर्ष पूर्ण झालं.'

'खुर्चीसाठी सरकार चालविण्याचा प्रयत्न चालु आहे. सकाळी भांडायच, आणि संध्याकाळ झाली की जुळवून घ्यायचं. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. १७७ देशातील रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. सर्व्हेक्षण इफेकटीव्ह झालं नाही. आरोग्य विषयात वाताहत झाली. कोरोना काळात भ्रष्टाचार झाला. अधिवेशन घ्या वाभाडे काढतो. मात्र ते अधिवेशन घेणार नाही.' असा चंद्रकांत पाटील यांनी आरोप केला आहे.

'शेतकऱ्यांना दहा हजार हेक्टरी मदत घोषित केली. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली. एकाही शेतकऱ्यांला प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही. खते घ्यायला रांगा लावायची वेळ आली नव्हती ती या सरकारनं आणली. लहान मुलांशी खेळ चालला आहे. शिक्षण क्षेत्राचा बट्याबोळ केला आहे. सुप्रीम कोर्टाने ठोकलं म्हणून परीक्षा कशीबशी घेतली. महिलांवरील अत्याचाराचा विचारच करू शकत नाही. वाचतांना देखील त्रास होतो.' असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

'आरक्षणाच्या बाबतीत घोळ केला. मराठा आरक्षणाचे मातीमोल केलं. गायकवाडांना डोळ्याचा त्रास झाला तरी काम करत होते. आम्ही सुप्रीम कोर्टात टिकवले मात्र यांना ते टिकवता आलं नाही. शिक्षणात बारा आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण काढून खुल्या वर्गात दिलं. पाईपलाईनमध्ये आहे ते तर पूर्ण करा, नोकरीबाबत निर्णय नाही. प्रवेशप्रक्रियेबाबत बोलले असते तर स्थगिती आली नसती. ओबीसीला टोचू नका, जातीजातीत तेड लावू नका. विविध विषयातील सर्वेक्षण करा, सरकार अपयशी असल्याचे दिसेल.' अशी टीका ही त्यांनी यावेळी केली आहे.