'दरेकरांनी समिती नेमून माझी, तावडे आणि स्मृती इराणींची डिग्री तपासावी'

माझी डिग्री बोगस असेल तर प्रवीण दरेकरांनी सिद्ध करावे असे खुले आवाहन त्यांनी दरेकरांना दिले आहे.

Updated: Jan 6, 2020, 12:22 PM IST
'दरेकरांनी समिती नेमून माझी, तावडे आणि स्मृती इराणींची डिग्री तपासावी'  title=

रत्नागिरी : माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या बोगस डिग्रीचं भूत आता उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मानगुटीवर बसले आहे. तावडेंच्या कार्यकाळात विरोधकांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून त्यांनी घेतलेल्या डिग्रीवरून हैराण करुन सोडले. आता उच्च तंत्रशिक्षण खात्याचा भाग स्वीकारुन दिवसही उलटला नसताना 'बोगस डिग्री'च्या भुताने मान वर काढली आहे. उदय सामंत यांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. माझी डिग्री बोगस असेल तर प्रवीण दरेकरांनी सिद्ध करावे असे खुले आवाहन त्यांनी दरेकरांना दिले आहे.

ज्ञानेश्वर विद्यापीठ हे कुठल्याच प्रकारची सरकारी मान्यता नसलेलं बोगस विद्यापीठ असल्याचा आरोप पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरदास यांनी केला आहे. त्यामुळे विनोद तावडे यांच्या प्रमाणे उदय सामंत यांची देखील पदवी बोगस असल्याचा त्यांचा आरोप आहे. 

१९९१-९२ सालात मी राजकारणात येईन की नाही मला माहीत नव्हत. ज्यांना गुण कमी आहेत, कुठे प्रवेश नव्हता पण व्यवसाय करायचाय त्यांच्यासाठी हे महाविद्यालय होत. मी १२ वी मुंबई विद्यापीठातून केली आणि नंतरचे शिक्षण ज्ञानेश्वर विद्यापीठातून झाल्याचे मी सुरुवातीपासून सांगत आलोय. मला भविष्यात आमदार व्हायचंय हे माहीत असतं तर मी ज्ञानेश्वर विद्यापीठात गेलो नसतो. मी कोणाला फसवलो नाही. 

ज्ञानेश्वर विद्यापाठातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज देशभरात आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष ज्ञान हे ज्ञानेश्वर विद्यापीठातून मिळत असल्याने मी तिथे प्रवेश घेतला. अशी विद्यापीठ असतील आणि ज्याचा विद्यार्थ्यांना त्रास होणार असेल तर मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून यावर निर्णय घेणार असल्याचे सामंत म्हणाले. 

ज्ञानेश्वर महाविद्यालयाने सर्व परवानग्या घेऊन प्रक्रियेत सामिल व्हावे असा एक अहवाल सादर झाला, पण आम्हाला डोनेशन किंवा अन्य गोष्टी नकोयत असे त्यावेळच्या संचालकांना वाटले. ज्ञानेश्वर विद्यापीठाची डीग्री दाखवून मी शासकीय स्वार्थ साधला नाही. जे विरोधक माझ्यावर आरोप करत आहेत त्यांनी समिती नेमावी आणि माझी, विनोद तावडे, स्मृती इराणी यांची चौकशी करावी असे त्यांनी म्हटले आहे.