Maharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या

Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे. 

Updated: Feb 24, 2023, 10:01 AM IST
Maharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या  title=
IMD issues alert Maharashtra Weather Forecast amid heat wave summer latest Marathi news

Weather Forecast Maharashtra : उन्हाच्या झळा फेब्रुवारीत नाकीनऊ आणताना दिसत आहेत. यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात जितकी थंडी पडली, त्याहूनही जास्त तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परिणामी यंदा उन्हाळ्यात तापमान उच्चांकावर पोहोचलेलं दिसेल. (IMD) हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 5 दिवसांमध्ये उत्तर पश्चिम आणि मध्य- पूर्व भारतामध्ये कमाल तापमानात 3 ते 5 अंशांची वाढ अपेक्षित आहे. तापमानाचा इतका आकडा सहसा मार्च महिन्याच्या अखेरी पाहायला मिळतो. पण, यंदा मात्र (February Temprature) फेब्रुवारीच्या मध्यापासूनच परिस्थिती भीषण आहे. 

पुढील दोन दिवसांमध्ये उत्तर मध्य भारतामध्ये हवामानात फारसे बदल अपेक्षित नाहीत. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातील पहिल्या 15 दिवसांमध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये तापमान 40 अंशांवर किंवा त्याहूनही दास्त असू शकतं. 

हेसुद्धा वाचा : Heat Wave In Maharashtra: फेब्रुवारीमध्येच विदर्भाला Heat Wave झळ! शहरांमधील तापमान पाहून अंगाला फुटेल घाम

महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि कोकणात तापमान वाढलं असून, पुणे आणि नजीकच्या परिसरातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या वतीनं कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत पुणे आणि आजुबाजूच्या परिसरात तापमानाची नेमकी काय स्थिती आहे याचा अंदाज सर्वांना दिला. ज्यानुसार कोरेगाव पार्क भागात गुरुवारी तापमान 38.4 अंशांव पोहोचल्याचं लक्षात आलं. तिथे अकोला, चंद्रपूरातही परिस्थिती काहीशी अशीच पाहायला मिळत आहे. 

एकाएकी इतकी उष्णता वाढली कशी? 

हवामान खात्यानं तापमानात झालेल्या या असमान्य बदलासाठी अनेक गोष्टींना कारणीभूत ठरवलं आहे. ज्यामध्ये पश्चिमी झंझावात सक्रीय न असणं हे मुख्य कारण सांगण्यात येत आहे. जे काही पश्चिमी झंझावात आतापर्यंत सक्रीय होते ते जास्त तीव्रतेचे नसल्यामुळं हवामानावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही आणि हिवाळ्यानं देशातून काढता पाय घेतला. आयएमडीच्या मते 1969 नंतर असं तिसऱ्यांदा होत आहे, जेव्हा फेब्रुवारीतच इतका उन्हाळा जाणवतोय. 

आरोग्य सांभाळा... लहान मुलांची विशेष काळजी घ्या 

सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहेत. ज्यामुळं लहान मुलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांमध्येही सर्दी- खोकला, ताप अशा समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामुळं वेळीच काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य यंत्रणांमार्फत देण्यात येत आहे. सध्याचं तापमान पाहता थंड खाणं टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, उन्हात बाहेर पडताना टोपी अथवा स्कार्फनं डोकं झाका असे सल्ले नागरिकांना देण्यात येत आहेत.