विद्यापीठ, कॉलेज आणि सीईटी परीक्षेबाबत महत्वाची बातमी

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत आणि कुलगुरु चर्चेत महत्वाचे निर्णय

Updated: May 5, 2020, 07:03 PM IST
विद्यापीठ, कॉलेज आणि सीईटी  परीक्षेबाबत महत्वाची बातमी title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत आज महत्वाची बैठक घेतली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल.  एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या बैठकीनंतर सांगितले.

राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या  समितीच्या अहवालावर  सविस्तर चर्चा करण्यात आली.

श्री. सामंत म्हणाले, या समितीचा अहवाल लवकरच राज्य  शासनाला सादर केला जाईल, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह  कोश्यारी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय  घेण्यात येईल.

बैठकीत पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा दि.१ जुलै ते १५ जुलै दरम्यान घेण्याबाबत, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET)  २० ते ३० जुलै २०२० दरम्यान घेण्याबाबत आणि  या परीक्षांचा निकाल १५ ऑगस्टपर्यंत जाहीर करून  दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का? याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच लॉकडाऊनचा  कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजर दिवस  (deemed to be attended) म्हणून ग्राह्य धरण्यात यावा आणि कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा याबाबतही चर्चा करण्यात आली.

शेवटच्या वर्षाची परीक्षा, तसेच एम.फिल व पी.एचडीचा मौखिकी (vivo) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास  त्यांना मुदतवाढ देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर अंतिम  निर्णय नंतर घेण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी संगितले.

विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्राची निर्मिती

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक  जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचना श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.

सीईटी परीक्षेसंदर्भात समिती

बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत  महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. बारावीनंतर आणि पदव्युत्तरसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजन संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी सध्या असलेलं जिल्हा स्तरावरील सीईटी केंद्राची संख्या वाढवून प्रत्येक तालुका स्तरावर तयार करण्यात यावे, अशी सूचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला राज्यातील सर्व विद्यापीठांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या आकस्मित निधीतील काही रक्कम आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभारही श्री. सामंत यांनी यावेळी मानले.

 

या व्हिडिओ कॉन्फरन्सला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज  माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे  कुलगुरू सहभागी झाले होते.