सीमावादाचा प्रश्न पेटला! महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात बंदी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या कन्नड भवनासाठी 10 कोटी रुपये देणार, कर्नाटकचे मुख्यमंत्री Basavaraj Bommai यांचा पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न

Updated: Dec 2, 2022, 04:53 PM IST
सीमावादाचा प्रश्न पेटला! महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात बंदी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा title=

Maharashtra-Karnataka Border Dispute :  सीमावादाचा प्रश्न चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पुन्हा बोंबाबोंब सुरू केलीय. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला (Belgaum) येऊ नये असा इशारा बोम्मईंनी दिला आहे. सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यासह इतर मंत्री उद्या बेळगावचा दौरा करणार आहेत. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असं सांगत पुन्हा एकदा कुरघोडीचा प्रयत्न केलाय. दरम्यान, सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या कन्नड भवनासाठी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा
तर महाराष्ट्राचे सीमा भाग समनव्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि इतर मंत्र्यानाही कर्नाटकमध्ये येवू नये यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविलं आहे. कर्नाटकमधील रामदुर्गमधल्या साळहल्ली इथं पत्रकाराशी बोलताना बोम्मई यांनी हा इशारा दिला आहे. सध्याची दोन्ही राज्यातील परिस्थिती पाहता चंद्रकांत पाटील यांनी बेळगावला येवू नये अशी विनंती त्या पत्रात उल्लेख असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. 

अनेक वेळा महाराष्ट्रातील मंत्री आणि नेते यांनी बेळगावमध्ये येण्याची भूमिका घेतली आहे. त्यावेळी जी भूमिका कर्नाटकची होती, तीच भूमिका आजही कायम असल्याचे बोम्मई यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्राच्या मंत्र्यानी बेळगावमध्ये येवू नये यासाठी फॅक्स केला आहे, जर यानंतरही कोणी प्रयत्न केले तर कारवाई केली जाईल असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलाय. चंद्रकांत पाटील आणि इतर मंत्र्याचा 3 नोव्हेंबरला होणारा दौरा हा आत्ता 6 डिसेंबरला होणार आहे.पण आत्ता कर्नाटक सरकारने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकार नेमकं काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा : छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, गुजरात मतदानानंतर राज्यपालांवर कारवाई?

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
राज्यातील एकाही व्यक्तीवर परराज्यात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलीय.  म्हैसाळ योजनेची (Mhaisal Dam) व्याप्ती वाढवून जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. त्यासाठी जानेवारी महिन्यात 2 हजार कोटींचं टेंडर काढण्यात येणारंय. पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर कर्नाटकात जाऊ असा इशारा दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील नागरिकांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. 

हे ही वाचा : पुण्यात 'झिका' व्हायरसचा रुग्ण आढळला

संजय राऊत यांची सरकारवर बोचरी टीका
कर्नाटकने जतमध्ये सोडलेल्या पाण्यात महाराष्ट्राच्या मुख्य़मंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय. आता कुठे गेली तुमची क्रांती असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय तर संजय राऊतांना पिसाळलेले कुत्रे चावले आहेत अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलीय.