कर्जमाफीचा घोळ, एवढ्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ

राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या पन्नास लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 2, 2018, 11:24 PM IST
कर्जमाफीचा घोळ, एवढ्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ title=

मुंबई : राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या पन्नास लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे. राज्यातील ८९ लाख शेतक-यांना ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल अशी घोषणा सरकारने ही योजना जाहीर करताना केली होती. या योजनेंतर्गत राज्य सरकराने ३१ मार्चपर्यंत ४६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम बँकांकडे जमा केलीय. यातील प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतक-यांची संख्या ३७ लाख असून त्यांच्या खात्यात आतापर्यंत १४ हजार ७०० कोटी रुपये जमा झालेत.

सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली असून ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली ही मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलीय. तर वन टाइम सेटलमेंटची मुदतही सरकारने ३० जूनपर्यंत वाढवलीय. मात्र ही मुदत वाढवूनही जास्त शेतकऱ्यांचे अर्ज येण्याची शक्यता कमी असल्याचे सहकार खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता.