लोकसभा निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांनी घेतले शिर्डीतील साईबाबांचे दर्शन

चिराग पासवान यांनी उद्योगपती राजेंद्र प्रताप सिंह यांचा मुलगा अमेय प्रताप सिंह यांच्या लग्नाला उपस्थिती लावली. यावेळी चिराग पासवान यांनी बिहार आणि झारखंडमधील मतदारांची भेट घेतली.

Updated: Mar 21, 2024, 10:55 PM IST
लोकसभा निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांनी घेतले शिर्डीतील साईबाबांचे दर्शन  title=

Chirag Paswan Visit In Mumbai : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. संपूर्ण देशभरात 19 एप्रिलपासून 1 जून अशा सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होईल. याच पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान मुंबईत दाखल झाले आहेत. चिराग पासवान यांनी उद्योगपती राजेंद्र प्रताप सिंह यांचा मुलगा अमेय प्रताप सिंह यांच्या लग्नाला उपस्थिती लावली. यावेळी चिराग पासवान यांनी बिहार आणि झारखंडमधील मतदारांची भेट घेतली.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन घेतले दर्शन

चिराग पासवान यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील बरेच लोक मुंबईत काम करतात. त्यानिमित्ताने चिराग यांनी मूळ राज्यातील बिहारमधील मतदारांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

2020 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीए आणि महाआघाडी यांच्यातील विजय-पराजयामधील फरक पाहिला, तर हे स्पष्ट होते की या निवडणुकीत चिराग पासवान महत्वाची भूमिका बजावू शकतात. बिहार एनडीएमध्ये फूट पडली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप 17 जागा लढवणार आहे. JD(U) ला 16 जागा देण्यात आल्या आहेत. चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) पाच जागा लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.

हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार

गेल्या निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या चिराग पासवान यांनी त्यांचे वडील दिवंगत रामविलास पासवान यांनी सात वेळा प्रतिनिधित्व केलेल्या प्रतिष्ठित हाजीपूर जागेवरून ते एनडीएचे उमेदवार म्हणून लढणार आहेत, हे यापूर्वी स्पष्ट केले आहे. हाजीपूरच्या पाचव्या टप्प्याचे मतदान मे महिन्यात होणार आहे.

निकाल कधी?

 देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात 19 एप्रिलपासून 1 जून अशा सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. तर संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.