अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे निर्देश

अवकाळी  पावसाने राज्यात काही ठिकाणी जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात मोठे नुकसान झाल आहे.  

Updated: Jun 2, 2021, 07:47 AM IST
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे निर्देश title=

मुंबई : अवकाळी  पावसाने राज्यात काही ठिकाणी जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात मोठे नुकसान झाल आहे. या दोन्ही तालुक्यातील केळीच्या बागा वादळामुळे अक्षरश: उद्ध्वस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.  या तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने  पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.(Major damage to banana orchards due to rains in Jalgaon )

 जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या मान्सूनपूर्व पावसाने शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. तालुक्यातील खेर्डी, विटवा, ऐनपूर, निंबोल, सुरवाडी, वाघाडी या परिसरात जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खेर्डी गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. वादळी पावसामुळे केळीच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या असल्याची तक्रारी करण्यात आल्या होत्या. अवकाळी पावसाने जळगावातील केळी बागांचे नुकसान झाल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही  वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांचे लवकर पंचनामे करा असे निर्देश  वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांंनी काल नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली होती. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली होती.