'शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणि नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत मश्गूल'

शिवसेनेच्या कृषी सल्लागारांचा सरकारला घरचा अहेर  

Updated: Nov 1, 2019, 07:56 AM IST
'शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणि नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत मश्गूल' title=

मुंबई : शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या २० लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची नासाडी आणि नुकसान झालं आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आत्महत्या करु लागले आहेत. मात्र अशा या भीषण परिस्थितीत लोकप्रतिनिधी मात्र मंत्रिपदाच्या शर्यतीत मश्गूल आहेत. त्याचवेळी पीकविमा कंपनी आणि कृषी तसंच महसूल अधिकारी दिवाळीच्या सुटीचा आनंद लुटत असल्याची टीका, किशोर तिवारी यांनी केली आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट

दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळानं राज भवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं. परतीच्या पावसानं तसंच क्यार चक्रीवादळानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी राज्यपालांना करण्यात आली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावं, असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं.

कोल्हापुरात कोट्यवधींचं नुकसान 

राज्यात पूरस्थिती, अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे, शेतकऱ्यांचं १ हजार २९८ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यात भर म्हणून अवकाळी पावसामुळे ९० कोटींच्या दरम्यान कोल्हापुरातल्या बळीराजाला फटका बसलाय.

रत्नागिरीत भातशेतीला फटका

क्यार वादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर रत्नागिरीत प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी सुरवात झालीय. जिल्ह्यात सुमारे ४० टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका बसला असेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. ऐन भात कापणीच्या हंगामातच पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा धास्तावला होता. काहींनी पावसाची विश्रांती मिळाल्यानंतर लगेचच कापणीला सुरवात केली. कापलेले भात मळ्यांमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यात तरगंत होते. निमगरव्या प्रकारची शेती या तडाख्यात पोळली गेली. मुसळधार पावसामुळे तयार झालेलं भाताचं पिक आडवं झालंय. लोंबीचे दाणे जमिनीवर पडून ते पुन्हा रुजून येऊ लागले आहेत. अशी परिस्थिती कोकण पट्ट्यात प्रथमच उद्भवल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. रत्नागिरीतल्या गावखडी भागात तर गुडगाभर पाण्यात भात कापणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.

पालघरमध्येही उभी पिकं शेतातच कुजली

पालघर जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेती तसेच सुक्या मच्छीचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील मनोर, डहाणू, विक्रमगड, वाडा, तलासरी या भागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हातची पीकं शेतात कुजत आहेत. तर डहाणू, दांडी, नवापूर, सातपाटी या भागात मोठ्या प्रमाणावर बोंबिल आणि इतर मासे या दिवसात सुकवले जात असल्याने पावसामुळं तेही खराब झाली आहे. दरम्यान तालुका निहाय बाधित क्षेत्राची माहिती संकलन जिल्ह्य़ाकडे करणं सूरू आहे. 

 

मराठवाडा-मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

तर, परतीच्या पावसानं झोडपलेल्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पुढील ४ ते ५ दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह पडेल असं हवामान खात्यानं म्हटलंय. पाऊस आणखी लांबल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय. अगोदरच पावसानं खरीपांच्या पिकांचं नुकसान केलंय. त्यामुळं उरलंसुरलेलं पीकही हातचं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.