'मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत काम करतात, मी सकाळी 5 वाजल्यापासून काम करतो, आमचं 24 तास काम करणारं सरकार'

Ajit Pawar On Maharashtra Government:  आमचं सरकार 24 तास काम करत असतं, याचा पुनरुच्चार केला.

Pravin Dabholkar | Updated: Aug 11, 2024, 04:28 PM IST
'मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत काम करतात, मी सकाळी 5 वाजल्यापासून काम करतो, आमचं 24 तास काम करणारं सरकार' title=
उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar On Maharashtra Government: आमचं सरकार 24 तास काम करणारं सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी सांगत असतात. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 24 तासाची फोड करुन दिली आहे. आमचं सरकार 24 तास काम करत असतं, याचा पुनरुच्चार केला.उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौ-यावर आहेत.कागलच्या निपाणी वेसमध्ये अजित पवार गटाच्या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.या मेळाव्यातून हसन मुश्रीफ हे विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत.महायुतीमध्ये कागल मतदारसंघाचा पेच असताना अजित पवार हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

24 तास काम करणार सरकार

आमचं सरकार 24 तास काम करत असतं. आमचे मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत काम करत असतात आणि मी पहाटे 5 वाजता उठून कामाला लागतो.याचा अर्थ आमचं सरकार 24 तास काम करणारं असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

20 कोटीपेंक्षा कितीही निधी द्यायला तयार 

कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटी पेक्षा कितीही रक्कमही सरकार द्यायला तयार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. शिवाय निधीला उशीर झाल्याने बांधकामाला उशीर झाला असं मी हाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. आगीत भस्मसात झालेल्या या नाट्यगृहाची आज अजित पवारांनी पाहणी केली. याठिकाणी पोहोचल्यानंतर दादांनी अतिशय बारीक-सारीक गोष्टींची पाहणी केली आणि अधिका-यांना काही सुचना केल्या. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मंजूलक्ष्मी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत याच्याकडून घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेतली.

आता मुख्यमंत्रिपदी संधी मिळणार का? 'झी 24 तास'च्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी स्पष्टच सांगितले...

अजित पवारांना आव्हान 

गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय. अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दमानियांना परदेश दौ-यावरून लक्ष्य केल्यानंतर दमानिया आक्रमक झाल्यात. दमानिया परदेश दौरा करतात. स्पॉन्सरशिप कुठून मिळते? त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय?  इतके परदेश दौरे कशा करू शकतात? असे सवाल सूरज चव्हाणांनी केले होते. यावरून अंजली दमानियांनी आता थेट अजित पवारांनाच आव्हान दिलंय. 17 तारखेला मुंबईत येत आहे. 3 वर्षांच्या प्राप्तीकर परताव्याच्या प्रती घेऊन येते. अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत, असं आव्हान दमानियांनी दिलीय. तर अजित पवारांना एवढंच काम नाही, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी दिलीय.

प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत.. मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना अद्याप मिळाली नाही.. मात्र अजितदादांच्या मनातली ही खदखद अनेकदा बाहेरही येते.. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विधानसभेला मी सिनिअर आहे. हे सगळे पुढे निघून गेले मात्र मी मागेच राहिलो, अशी खदखद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवली होती.. मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत दादांना खरंच काय वाटतं? मुख्यमंत्रिपदी संधी मिळणार का? असा प्रश्न अजित पवारांबाबत सर्वांना पडतो. झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर दिलखुलास उत्तर दिलं.  मुख्यमंत्रिपदी संधी मिळणार का या प्रश्नावर उत्तर देताना, 'कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण होतील असं बोलायचं नसल्याचे' दादांनी सांगितलं. 'प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. ध्येय डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय पुढे वाटचाल करु शकत नाही'असे ते म्हणाले. 'झी 24 तास'च्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबत अजित पवारांनी स्पष्टोक्ती दिली आहे.महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. आम्ही जे काम केलंय त्याबद्दल मी बोलतोय. मला कोणावर टीका करायची नाहीय. आम्ही केलेली काम जनतेसमोर न्यायची आहेत.