महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी

Uday Samant : राज्यातील उद्योग परराज्यात गेल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.अशातच आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. 1500 कोटी रुपयांचा उद्योग लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 13, 2023, 04:12 PM IST
महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी title=

Maharashtra News : राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक काही महिन्यांपूर्वी सामोरे आले होते. परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याचवेळी विरोधकांमुळेच हे उद्योग राज्याबाहेर गेल्याचे म्हटलं होतं. दुसरीकडे आता उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. मी उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात प्रथमच पंधराशे कोटी रुपयांचा कोका कोलाचा उद्योग (coca cola industry) उभारला जात आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चिपळूण मधील वशिष्टी नदीतील बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंधराशे कोटीचा कोको कोला उद्योग येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केल्यानंतर राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोटे एमआयडीसीमध्ये लवकरच कोको कोलाचा 1500 कोटींचा उद्योग सुरु होणार आहे. या उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. या उद्योगाच्या  उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता असल्याचे उदय सामंत म्हणाले. तसेच वर्षभरामध्ये अनेक कंपन्या कोकणामध्ये उद्योगासाठी आलेल्या असतील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

"पंधराशे कोटीचा कोका कोला उद्योग उभारला जात आहे. मी उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिला उद्योग रत्नागिरी जिल्ह्यात आणण्यात आला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील.दोन वर्षापूर्वी चिपळूणला पूर आला तेव्हा माजी पालकमंत्री अनिल परब यांनी पळ काढला. त्यादिवशी सकाळी 6.30 वाजता अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी मुंबईला जाण्यासाठीचा मार्ग विचारला आणि चिपळूणकरांना वाऱ्यावर सोडून परब गोवा मार्गे मुंबईला गेले. हा मोठा गौप्यस्फोट म्हणा की आणखी काही, पण मी आज त्यावेळची वस्तुस्थिती सांगितली, असे उदय सामंत म्हणाले.