शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; TET परीक्षेची तारीख जाहीर

Maharashtra TET Exam 2024 Dates Announced: जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे यंदाच्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वनिता कांबळे | Updated: Sep 12, 2024, 12:58 PM IST
शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; TET परीक्षेची तारीख जाहीर title=

Maharashtra Teacher Eligibility TET Exam 2024 Date: शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय.. शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी टीईटी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी या परीक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपवण्यात आली आहे.

टीईटी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं प्रकरण गेल्या वर्षी उघडकीस आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर टीईटी 2024 चा काय होणार याबद्दल साशंकता होती. मात्र आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे यंदाच्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय... राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरण्याच्या सुविधेसह परीक्षेबाबतचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे.

राज्यात शिक्षकांची 24 हजार पदं भरण्यात येणार आहेत. तशी घोषणाही झालीय. मात्र शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडलीय. त्याविरोधात राज्यातील डीएड, बीएडधारक उमेदवारांनी पुण्यात बेमुदत उपोषण केले होते. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली बिंदू नामावलीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यासाठी शिक्षण विभाग जबाबदार असल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. 

BMC लिपिक पदासाठी असलेली जाचक अट अखेर रद्द 

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी भरती सुरु आहे. मात्र या लिपिक पदासाठी असलेली जाचक अट अखेर रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने भरती प्रक्रिया सुरु होणार आहे... लिपिक पदासाठी 1 हजार 846 जागा सरळसेवेने भरण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी दहावी तसंच पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावा अशी शैक्षणिक अट लागू करण्यात आली होती. मात्र यावरुन मोठा वाद झाला. ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने अखेर ही अट रद्द केली आहे. आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळालाय..