Weather Update :विदर्भ, मराठवाड्याकडून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे; गणपती गाजवणार, 20 राज्यांमध्येही मुसळधार

Maharashtra Weather Update : अरे देवा! पावसानं दिशा बदलली? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त. पावसाचा अंदाज पाहूनच ठरवा उरलेला दिवस   

सायली पाटील | Updated: Sep 4, 2024, 06:53 AM IST
Weather Update :विदर्भ, मराठवाड्याकडून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे; गणपती गाजवणार, 20 राज्यांमध्येही मुसळधार  title=
(छाया सौजन्य- सोशल मीडिया)/ Maharashtra Weather news Konkan ghat region will have heavy rain 20 states on alert latest update

Maharashtra Weather Update : विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर या भागांमध्ये काही अंशी कमी झाला असून, येत्या काळात हाच पाऊस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर बरसताना दिसणार आहे. ज्यामुळं आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये अडचणी आणखी वाढताना दिसणार असल्याचा अंदज वर्तवण्यात येत आहे. (Vidarbha and Marathwada Rain)

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच पावसानं कोकणाकडे मोर्चा वळवल्यामुळं पाऊस गणपती गाजवणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही. देशात सध्या राजस्थानपासून कमी दाबाच्या पट्ट्याचं एक क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वेला सक्रिय आहे. तर, गुजरातच्या दक्षिणेपासून केरळच्या मध्य किनारपट्टी क्षेत्रापर्यंत सक्रिय असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं कोकणासह राज्यातील घाटमाथ्यावर पाऊस जोरदार हजेरी लावताना दिसणार आहे. तर, विदर्भातील काही भागांची पावसाच्या तडाख्यातून सुटका नाही हेसुद्धा हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Konkan Rain Alert)

कोणत्या भागांसाठी यलो अलर्ट? 

येत्या काळात राज्यात पावसाचा जोर कमी होणार असला तरीही हवमानाच्या प्रणालीची काहीच शाश्वती नसल्यामुळं सध्या सातारा आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

देशभरातील 20 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा 

भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार तेलंगणासह, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, असम, मेघालय, नगालैंड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात हा इशारा देण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झाले

 

तिथं हिमाचल प्रदेशातही काही भागांमध्ये पावसामुळं वातावरण बिघडताना दिसत असून, इथं वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशभरात सध्या पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत असून, राजस्थान आणि गुजरातसह दक्षिणेकडे आंध्रप्रदेशापर्यंत पावसानं धुमाकूळ घातला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर हा पाऊस विरळ होणार असून, परतीचा प्रवास सुरू करेल असाही प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.