Maharastra Politics : 'मणिपूर'वरून महाराष्ट्रात रणकंदन, शरद पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले राजकीय नेते?

Sharad Pawar on Manipur violence : महाराष्ट्रात मणिपूरसारखं घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं? खरंच राज्याची सामाजिक परिस्थिती चिंता वाटण्यासारखी झालीय का? आणि पवारांच्या विधानावर विरोधकांचं नेमकं काय मत आहे.जाणून घेऊयात एका सविस्तर रिपोर्टमधून..

सौरभ तळेकर | Updated: Jul 29, 2024, 08:18 PM IST
Maharastra Politics : 'मणिपूर'वरून महाराष्ट्रात रणकंदन, शरद पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले राजकीय नेते? title=
Sharad Pawar on Manipur violence

Maharastra Politics : मणिपूरच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडेल की काय अशी चिंता वाटतेय असं पवारांनी म्हटलंय. मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडलं. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, अशी टीका पवारांनी केलीय.तर निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलतायत ते चांगलं नाही. समाजा समाजात तेढ निर्माण करणा-यांना थांबवण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन बावनकुळेंनी केलंय. तर महाराष्ट्र आणि मणिपूरची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तशी स्थिती होणार नसल्याचं आमदार बच्चू कडूंनी म्हटलंय.

संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यानुपिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झालाय. सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर टीका केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेलं विधान राज्यातील सामाजिक स्थितीबाबात गंभीरपणे विचार करायला लावणारं आहे. आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काही तरी घडेल अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलीय. मणिपूरच्या निमित्तानं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र डागलं.

निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा पवारांच्या तोंडून योग्य नसल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली. तर पवारांनी हातभार लावू नये असं म्हणत राज ठाकरेंनीही आपल्या खास शैलीत पवारांना खोचक टोला लगावला. तर दुसरीकडं महाराष्ट्र आणि मणिपूरची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे मणिपूरसारखी परिस्थती राज्यात होणार नसल्याचं आमदार बच्चू कडूंनी म्हटलंय.

दरम्यान, राज्याबाबत पवारांनी व्यक्त केलेली चिंता विचार करायला लावणारी आहे. महाराष्ट्रही वर्षभरापासून आरक्षणाच्या आंदोलनांनी ढवळून निघालाय. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष राज्यात तापलाय. त्यामुळे राज्यकर्त्यांनो एकत्र येऊन यातून मार्ग काढा. महाराष्ट्रातील जातीय सलोखा कायम राहुद्या एवढीच सर्वसामान्यांची आशा आहे.