महाविकास आघाडीत नाराज कपिल पाटील राज ठाकरेंच्या भेटीला; म्हणाले, 'काहीजण अकारण वातावरण पेटवतायत'

Mahavikas Aghadi: मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 17, 2024, 09:47 AM IST
महाविकास आघाडीत नाराज कपिल पाटील राज ठाकरेंच्या भेटीला; म्हणाले, 'काहीजण अकारण वातावरण पेटवतायत' title=
नाराज माजी आमदार राज ठाकरेंच्या भेटीला

Mahavikas Aghadi: विधानसभा निवडणुकीआधीच राज्यात महाविकास आघाडीला गळती लागण्याची शक्यता आहे. समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील हे महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हजर राहिले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यातील दुरावा वाढल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे आणि कपिल पाटलांच्या भेटीने या नाराजीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता. यामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला तर कपिल पाटील यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला होता.तेव्हापासून महाविकास आघाडीवर कपिल पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. 

आज कपिल पाटील यांनी मुंबईत गोरेगावात  राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. त्यामध्ये कपिल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत.कपिल पाटील हे गोरेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.

राज ठाकरेंमध्ये महाराष्ट्रात सलोखा टिकवण्याची ताकद 

महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती गेल्या काही दिवसात बिघडलेली दिसते. राज्यातील सलोखा कायम राहिला पाहिजे. हा सलोखा ठेवण्याची ताकद काही कमी जणात आहे. त्यामुळे मी राज ठाकरेंची भेट घेतली. काहीजण अकारण वातावरण पेटवत आहेत. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. यात सलोखा टिकवण्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकार घ्यावा, यासाठी भेट घेतल्याचे कपिल पाटील म्हणाले.  मी सामाजिक प्रश्नांसाठी काम करणारा नेता आहे. नंतर राजकारणी आहे. यासाठी मी विविध नेत्यांच्या भेटी घेत असतो. सामाजिक सलोखा राजकीय संवादातून होतो. यासाठी राजकारणी काम करु शकतात. राज ठाकरेंची भेट मी याआधीदेखील घेतली आहे. 

महाविकास आघाडीतून बाहेर पडलात का?

या देशातून हुकूमशाही वृत्तीला वेसण बसावी, संविधानाती मुल्य जपावी यासाठी जनतेनं इंडिया आघाडीला मतदान दिलं. आता महाराष्ट्राची निवडणूक आहे. महाराष्ट्रातील सलोखा टिकून राहिला पाहिजे. महाविकास आघाडीच्या बैठकीला मला निमंत्रण नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बिघडली आहे महाराष्ट्राच्या एकोपा सलोखा कायम राहायला हवं हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे करू शकता पुढाकार घ्यावा याकरता मी सर्व राजकीय नेत्यांची भेट घेतली.सामाजिक सलोखा हा संवादातून होतो. सध्या राजकीय चर्चा झाली नसल्याचे कपिल पाटील म्हणाले. 

शाहु फुले आंबेडकर यांचे विचार कायम राहीले पाहिजे. महाविकास आघाडीच्या कालच्या मेळाव्याबाबत मला माहीत नाही. 3 पक्षांची बैठक झाली. काहीतरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार होते म्हणून बैठक झाली असावी, असे ते म्हणाले. 

महाविकास आघाडी हवेत

मागच्या निवडणुकीत हुकुमशाही विरोधात लढा दिला. आता चित्र वेगळे आहे महाविकास आघाडी हवेत. अल्पसंख्याक वंचितांच्या बाबत भुमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले.