मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 'त्या' वक्तव्यांप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिले SIT चौकशीचे आदेश

SIT Inquiry Manoj Jarange Patil Inquiry: आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करुन टाकण्याची भाषा केल्याचा उल्लेख करत चौकशीची मागणी केली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 27, 2024, 01:00 PM IST
मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 'त्या' वक्तव्यांप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिले SIT चौकशीचे आदेश title=
जरांगे पाटील प्रकरणावरुन विधानसभा, विधानपरिषदेत गोंधळ

SIT Inquiry Manoj Jarange Patil Inquiry: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानांवरुन विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले आहेत. भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करुन टाकण्याची भाषा केल्याचा उल्लेख करत या प्रकरणात चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. तर विधानपरिषदेमध्ये आमदार प्रवीण दरेकर यांनी आशिष शेलार यांचाच मुद्दा उचलून धरत जरांगेवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.

नार्वेकरांनी दिली निर्देश

राज्याच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये आज मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे पाटलांच्या विधानांवरुन सत्ताधारी भाजपाने जरांगेंच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर आता जरांगेंच्या आंदोलनाची, त्यांना देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची एसआयटीमार्फत चौकशी करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

हेसुद्धा वाचा : 'जर आई-बहिण काढत असेल...', फडणवीसांच्या त्या विधानावर जरांगे संतापले, 'जेव्हा आमच्या आयांच्या छाताडावर...'

महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कोणाची?

मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला होता, असं आशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी कोणतही कायदा सुव्यवस्था बिघडेल असं वक्तव्य केलं नाही, असंही शेलार म्हणाले. तुला निपटवून टाकू अशी जरांगेंची फडणवीसांसंदर्भातील भाषा होती. मनोज जरांगे पाटील असं भाषण कसं काय करू शकतात? असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> 'जरांगे सतत मागण्या बदलत राहिले'; शिंदेंचा दावा! सरकारने मराठ्यांसाठी काय केलं पाढाच वाचला

या सदनाच्या कारकिर्दीला कोणीही काळं फासत असेल तर विरोधीपक्ष नेते देखील आमच्यासोबत असतील. महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कोणाची? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निपटून टाकू ही धमक कशी आली मनोज जरांगेमध्ये? असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला.

हेसुद्धा वाचा : Maratha Reservation : 'जोपर्यंत मुख्यमंत्री होतो...' मनोज जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री स्पष्टच बोलले

यामागे राष्ट्रवादी असेल तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा उधळून लावू म्हणतात, पण तुम्ही आहात कोण असा माझा सवाल आहे, असं शेलार म्हणाले. कटकारस्थानाची ही योजना बनली कशी? मराठा समाजाची मोनोपॉली एका व्यक्तीला दिली का? जरांगे कुठं राहतात ? तो कारखाना कुणाचा? ते दगड कुठून आले? हे समोर आलं पाहिजे असं आशिष शेलार म्हणाले. अंतरावली सारटी दगडफेक प्रकरणी एसआयटी लावा अशी मागणीही त्यांनी केली. यामागे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर या प्रकरणाची एसआयटी लावा असं आशिष शेलार यांनी म्हणताच सभागृहात गदारोळ झाला. यानंतरच नार्वेकरांनी चौकशीचे आदेश दिले.