पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर 50 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; तरुण-तरुणी बेशुद्ध होऊन गंभीर जखमी

पुण्यात सिंहगडावर जवळपास 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडलीय.सिंहगडावरील तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला.

Updated: Jun 18, 2023, 09:48 PM IST
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर 50 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; तरुण-तरुणी बेशुद्ध होऊन गंभीर जखमी title=

Sinhagad Fort Pune : पुण्यात सिंहगडावर जवळपास 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सिंहगडावरील तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झालेआहेत.  त्यातील बेशुद्ध पडलेल्या पाच ते सहा जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये दहशत पसरली आहे. 

पर्यटकांची  सिंहगडावर तुफान गर्दी

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांनी मोठी गर्दी होती. अशातच मधमाशांनी हल्ला केल्यानं पर्यटकांची मोठी धावपळ झाली. गडावर मधमाशांच्या हल्ल्याच प्रमाण वाढल्यानं, गडावर येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 

काय झालं नेमकं?

पर्यटक सिंहगड किल्ल्यावर फिरत असताना टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात मधमाशांचा थवा आला. यावेळी येथे उपस्थित असलेल्या पर्यटकांवर या मधमाशांनी हल्ला केला. यामुळे पर्यटक गोंधळले. भयभित झाले. सरैवैरा पळू लागले. मधमाशांच्या हल्ल्यात पाच ते सहा जण बेशुद्ध देखील झाले. तर, अनेक जण जखमी झाले. तात्काळ सर्व पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पुण्यात उन्हाळी शिबिरादरम्यान दोनशे जणांना मधमाशा चावल्या

पुण्याच्या वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या दोनशे जणांना मधमाशा चावल्याचा प्रकार घडला होता. शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबिरासाठी एक ग्रुप पुण्यातून वेल्ह्यात आला होता. त्यात 151 मुलं, 15 शिक्षक आणि इतर 37 स्वयंसेवक अशा जवळपास दोनशे जणांवर मधमाशांनी हल्ला चढवला. प्राथमिक माहितीनुसार भडक केशरी रंगाचे टी शर्ट घालून विद्यार्थी मंदिरात जमले होते. भडक रंग आणि नव्या कपड्यांच्या वासामुळे आकर्षित होऊन मधमाशांनी हल्ला चढवला. जखमींना वेल्हा ,नसरापूर या ठिकणी उपचारासाठी हलवण्यात आले होते. शिवनेरी किल्ल्यावर देखील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला झाला होता. यात 200 ते 250 जणांना मधमाशांचा चावा घेतला होता. 

सिंहगडावर ईबस सेवा पर्यटकांसाठी ठरतेय मनस्ताप

पुण्यातील सिंहगडावर ईबस सेवा पर्यटकांसाठी मनस्ताप ठरत आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झालीय. स्थानिकांचा रोजगार धोक्यात आलाय. असं असताना वन विभाग आणि पीएमपीएलकडून आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करत 5 मे ला सिंहगड किल्ला बंद ठेवण्याचा इशारा राजे शिवराय प्रतिष्ठानने दिला होता.