Rohit Patil : शेतकऱ्यांसाठी आर आर आबांच्या मुलाची देवेंद्र फडणवीसांकडे धाव; केली मोठी मागणी

Rohit Patil : सांगलीच्या कवटेमंहाकाळ मतदारसंघापासून राजकारणाची सुरुवात करणारे रोहित पाटील आता राज्याच्या राजकारणातही सक्रीय होताना दिसत आहे. नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत रोहित पाटील यांनी महत्त्वाची मागणी केली आहे

Updated: Dec 31, 2022, 11:05 AM IST
Rohit Patil : शेतकऱ्यांसाठी आर आर आबांच्या मुलाची देवेंद्र फडणवीसांकडे धाव; केली मोठी मागणी title=

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) हे राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मतदारसंघाता रोहित पाटील यांचा मोठ्या प्रमाणात दबदबा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सक्रिय राजकारणात उतरत रोहित पाटील यांनी इतर मुद्द्यांवरही लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत महत्त्वाची मागणी केली आहे.

सरकारच्या वतीने प्लास्टिकचा वापर कमी करण्यासोबत त्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र पूर्णपणे बंदी आणून देखील सर्सासपणे प्लास्टिकच्या उत्पादनांचा वापर केला जात आहे. अशातच शेतकऱ्यांनाही प्लास्टिक फुलांच्या पर्यायामुळे मोठा फटका बसला आहे. गेल्या काही काळांपासून अल्पदरात प्लास्टिकची फुले उपलब्ध होत असल्याने फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. याबाबत आता रोहित पाटील यांनी आक्रमक होत थेट यावर बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर या भेटीसंदर्भात माहिती दिली आहे. "आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेत मतदारसंघातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने प्लास्टिक फुलांवर बंदी घालून शेतकरी जे फुल पिकवत आहेत त्याला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी केली. यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांसह बैठक लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले असून मतदारसंघातील व राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो," असे रोहित पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्लास्टिक फुलावर बंदी घालण्यात यावी यासंदर्भात मागणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांसह बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती रोहित पाटील यांनी दिली आहे. राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे, असे रोहित पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कृत्रिम प्लास्टिक फुलांमुळे पर्यावरणाची हानी होत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच शेतीसाठी हरितगृह उभारण्याची मर्यादा किमान पाच एकरांपर्यंत करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यांसदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना ऑक्टोबर महिन्यात निवेदन देखील दिले आहे. महाराष्ट्रातील शेती विषयक समस्या जाणून घेण्यासाठी तोमर राज्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन कृषीमंत्री तोमर यांनी दिले होते.