Maharashtra Gram Panchayat Election : "नैरोबी-केनियाच्या ग्रामपंचायतीतही...."; फडणवीस यांच्या दाव्यावर संजय राऊतांनी लगावला टोला

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : कोणी काहीही काळजी करु नका, महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी निकालाआधीच केला होता

Updated: Dec 20, 2022, 12:21 PM IST
Maharashtra Gram Panchayat Election : "नैरोबी-केनियाच्या ग्रामपंचायतीतही...."; फडणवीस यांच्या दाव्यावर संजय राऊतांनी लगावला टोला title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील 7 सात हजार 751 ग्रामपंचायतींचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. जनतेतून थेट सरपंच (sarpanch) निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार रविवारी मतदान पार पडले होते. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. महाविकास आघाडी (MVA) विरुद्ध शिंदे गट आणि भाजप असा सामना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र निकालाआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या निवडणुकीत भाजपच मोठ्या फरकाने जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा केला होता. "उद्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, तुम्ही  लिहून घ्या की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका," असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

उसमें क्या है… - संजय राऊत

ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांवरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रत्तुत्तर दिलं आहे. "ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर कधी कुणीच दावा करू नये. ज्या निवडणुका पक्षाच्या नावावर, चिन्हावर लढवल्या जातात, तिथे असा दावा केले जाऊ शकतो. ग्रामपंचायत निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढल्या जातात हे काय देवेंद्र फडणवीसांना आम्ही सांगायला नको. दावे तुम्ही खुशाल करा. नैरोबी-केनियालाही ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्यात दोन दिवसांपूर्वी. तिथेही हे म्हणतील की आमचे लोक निवडून आले. उसमें क्या है… महाराष्ट्र, देशात होणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते लढतात. आपापले पॅनल उभे करतात. कुणी जिंकून येतं," असे संजय राऊत म्हणाले.

आतापर्यंतच निकाल काय?

कोल्हापुरात गांधीनगर येथे भाजपला सत्ता कायम राखण्यात महाडिक गटाला यश आले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार सतेज पाटील यांना धक्का बसला आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायतवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपची सत्ता आली आहे