नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांची पहिली अशी प्रतिक्रिया

Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात मोठे पडसाद उमटलेत. 

Updated: Aug 25, 2021, 07:56 AM IST
नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांची पहिली अशी प्रतिक्रिया title=
Pic Courtesy : PTI

मुंबई : Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात मोठे पडसाद उमटलेत. त्यांच्याविरोधात अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी महाड न्यायालयाने त्यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर रात्री उशिरा जामीन मंजूर केला. दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणावर मला काही बोलायचे नाही!

नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल वृत्तवाहिन्यांशी बोलताना शरद पवार यांनी अधिक भाष्य केले नाही. मात्र, टोला लगावला. या प्रकणावर मला काही बोलायचे नाही. मी राणेंना फारसे महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या संस्काराप्रमाणे ते बोलतात, असे पवार म्हणाले.

जामीन मंजूर झाल्यानंतर राणे यांचे ट्विट

नारायण राणेंना जामीन मंजूर झाला आहे. पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर महाड न्यायालयाने रात्री उशिरा राणे यांना जामीन मंजूर केला. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना रत्नागिरीतल्या संगमेश्वरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाडला आणण्यात आलं. रात्री उशिरा न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतर राणे यांनी ट्विट केले आहे, 'सत्यमेव जयते' असं राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई गाठली. न्यायालयात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे याही होत्या. भाजपची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे. राणेंसह भाजपचे सगळे नेते मुंबईत परतलेत.एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा पुन्हा कधी सुरू करायची, याचा निर्णय होणार आहे. 

10 जणांना अटक

दरम्यान, नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी आक्रमक होत 10 जणांना अटक केली आहे,तर बारा जणांचा शोध पोलीस घेत आहेत. भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी दीपक दातीर आणि शिवसेना कार्यालय दगडफेक प्रकरणी मुकेश शहाणे या दोन नगरसेवक  फरार झाले आहेत.भद्रकाली पोलिस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून भद्रकाली पोलिसांच्या दोन टीम दगडफेक करणाऱ्यांच्या शोधार्थ रवाना झाल्या आहेत. दगडफेकीचे व्हिडीओ तपासून नाव निष्पन्न करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.