आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथक, बोर्डाचा महत्वाचा निर्णय

 लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ही भरारी पथके फिरणार 

Updated: Feb 5, 2020, 10:11 AM IST
आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथक, बोर्डाचा महत्वाचा निर्णय title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : राज्यात पहिल्यांदाच लातूर शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक अर्थात प्रॅक्टिकल परीक्षेलाही आता भरारी पथक नेमली आहेत. लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ही भरारी पथके फिरणार आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी लातूरच्या शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. 

याची राज्यभर अंमलबजावणी केल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार होतील असा दावा लातूर बोर्डाने केलाय. मात्र या निर्णयाला काही शिक्षक संघटनांनी  विरोध केल्यामुळे शिक्षण मंडळाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीला आळा बसावा म्हणून राज्य शिक्षण मंडळ हे भरारी पथक नेमत असतं. फक्त लेखी परिक्षेलाच ही भरारी पथकं आतापर्यंत कार्यरत राहतात. मात्र यावर्षी पासून लातूरच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने होऊन विविध परीक्षा केंद्रावर भेटी देत असत. 

आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी यासाठी लातूरच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक परिक्षेलाही भरारी पथक नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 

अनेक शाळेत प्रात्यक्षिक परिक्षा न होता विद्यार्थ्यांचा चेहरा पाहून विद्यार्थ्यांना गुण दिले जात होते. दहावीच्या प्रत्येक विषयासाठी २० गुण तर बारावीसाठी ३० गुण विद्यार्थाना बहाल केले जातात. मुळात नेक शाळात प्रात्यक्षिक घेण्यासाठी विज्ञान साहित्यच उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा कागदोपत्रीच होत असल्याचे निदर्शनास आलं आहे. 

तशा तक्रारी लातूर बोर्डाला प्राप्त झाल्या. त्यामुळेच लातूर बोर्डाअंतर्गत येणाऱ्या लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरु केल्याचे लातूर बोर्डाचे प्रभारी सचिव औदुंबर उकिरडे यांनी स्पष्ट केलंय. 

अशा पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षांना भरारी पथक नेमण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळेच लातूरच्या शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक परिक्षेला भरारी पथके नेमली असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

यावर्षी दहावी बारावी प्रात्यक्षिके परीक्षांच्या तक्रारी प्राप्त. अध्यक्ष, सचिव, सहसचिव पथक तयार करून खरच प्रात्यक्षिके होतात कि नाही हे पाहतो. पूर्वी कसे तरी प्रात्यक्षिके उरकून टाकून होत होत्या. 

पहिल्यांदाच हा प्रयोग. राज्यभर राबविला तर मुलांची गुणवत्ता वाढेल असे लातूर शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव औदूंबर उकिरडे यांनी म्हटले. आता एक्सटेर्नल एक्सामिनारच्या उपस्थितीत हे बघितलं जाणार आहे. दहावीला सर्वच विषयांना अनेक शाळेत प्रयोगशाळा साहित्य ही नसल्याचे उकिरडे म्हणाले.

लातूर बोर्डाचे अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव यांच्या नेतृत्वाखाली हे भरारी पथक कार्यरत असणार असून ज्याठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गडबड असेल त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशाराही बोर्डाच्या प्रभारी सचिवांनी दिला आहे. मात्र या निर्णयाला आता विरोध ही होऊ लागला आहे. 

काही शिक्षक संघटनांनी याला विरोध केला असून या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राज्य शासन एकीकडे टक्केवारी वाढविण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेत असताना लातूरच्या शिक्षण मंडळाच्या भूमिकेत विरोधाभास कसा असा सवाल उपस्थित केलाय. 

एकीकडे टक्केवारी वाढविण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा ठेवली. आणि आता भरारी पथक हा विरोधाभास आहे. शिक्षकावर विश्वास न ठेवता प्रात्यक्षिक परीक्षा ठेवून आता भरारी पथक. शासन गुणांची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेते. हा विरोधाभास असल्याचे शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाधक्ष शिवकुमार मुरगे यांनी सांगितले.

एकूणच दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परिक्षेतील होणारे घोळ, शिक्षक आणि विविध शाळांमध्ये उपलब्ध नसणारे विज्ञान साहित्याचा मुद्दा यामुळे अधोरेखित झाला आहे. त्यामुळे गुणवत्तापुर्ण विद्यार्थीच्या मुद्द्यावरून शिक्षण मंडळ विरुद्ध शिक्षक संघटना आमने सामने उभे टाकल्या आहेत. 

मुळात गुणवत्तापूर्ण विद्यार्थि घडवायचे असतील तर लातूरच्या शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय योग्य असून राज्य सरकार त्यांची राज्यभर अंमलबजावणी करणार का हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.