बारावीची परीक्षा देणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशीसाठी बोलावले; असं केलयं तरी काय यांनी?

बारीवीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासताना शिक्षकांना उत्तर पत्रिकेत संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी देखील गोंधळले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: May 10, 2023, 09:35 AM IST
बारावीची परीक्षा देणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशीसाठी बोलावले; असं केलयं तरी काय यांनी? title=

HSC Exam 2023 : यंदा बारावीची परिक्षा सुरु असताना पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये देखील चुका आढळल्या होत्या. आता निकाल जवळ आला तरी बारावीच्या परीक्षेसंदर्भातील घोळ कायम आहे.  संभाजी नगर बोर्डाने 12 वीच्या जवळपास 300 वर विद्यार्थ्यांना बोर्डात चौकशी साठी बोलावले आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत शिक्षकांना अने संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. 

चौकशीसाठी बोलावण्यात आलेले बहुतांश विद्यार्थी अंबेजोगाईचे आहेत. फिजिक्सच्या पेपर मध्ये विद्यार्थ्यांच्या अक्षर विरहित दुसरे अक्षर आढळले आहे. काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पेपर तपासताना शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशी साठी बोलावलं आहे. तर, दुसरीकडे विद्यार्थी मात्र आम्ही पेपर मध्ये काहीही चूक लिहल नाही, बदल असलेले अक्षर आमचे नाही, त्यामुळं आम्हाला त्रास नको अशी भूमिका घेतली आहे.

त्यामुळं नक्की या सगळ्या पेपर्स मध्ये कुणी अक्षर बदल केला असा प्रश्न विद्यार्थी आणि बोर्डाला पडला आहे. या सगळ्या मुलांचे आता निकाल उशिराने लागण्याची शक्यता आहे.. पालक आणि विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर, बोर्डाने मात्र या सगळ्या प्रकाराची चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे. जर विद्यार्थ्यांनी लिहिलं नाही तर ह्या पेपरमध्ये नक्की कोणी लिहिलं याही प्रकरणाची शहानिशा केल्या जाईल असं बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले.

गणिताचा पेपर फुटला

बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातून  बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. साखरखेर्डा पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली होती यात दोन शिक्षकांचा समावेश होता.  12वी गणिताच्या पेपर फुटीचे पडसाद विधीमंडळातही उमटले.. विरोधीपक्षनेते अजित पवारांनी थेट झी 24तासची बातमीच विधानभवनात ऐकवून दाखवत या विषयावर गांभिर्यानं लक्ष देण्याची मागणी केली होती. यानंतर याप्रकरणी SIT मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले. 

बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका

बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका आढळून आल्या होत्या.  इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत कवितेवर आधारीत तीन प्रश्न चुकीचे छापण्यात आले होते. मात्र, चुकीचा प्रश्न सोडवणा-या सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण सहा गुण देण्याचा निर्णय बोर्डाने जाहीर  केला.  एखादा प्रश्न चुकला जरी असेल तरी विद्यार्थ्याने फक्त त्या प्रश्नाचा क्रमांक लिहिण्याची अपेक्षा असते. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या प्रश्नाचा क्रमांक लिहिला नसेल किंवा तो भाग सोडून दिला असेल तर हे सहा गुण मिळणार नाहीत. मात्र सरसकट सर्वांनाच गुण देण्याची मागणी विद्यार्थी तसंच पालकांनी केली होती.