उद्धव ठाकरेंचा टोला, CMपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा.  

Updated: Jun 23, 2019, 02:55 PM IST
उद्धव ठाकरेंचा टोला, CMपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा  title=

अहमदनगर : मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा. मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणे घेणे नाही. ते वेळ आल्यावर पाहू, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यां केले आहे. ते श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. एक, दोन निवडणुका जिंकल्यानं हुरळून जाण्याची गरज नाही, राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला. 

तसेच शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर मुक्ती मिळाली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. व्यासपीठावर केवळ महाराजांचा पुतळा ठेवून त्यांचे मावळे होता येत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसंच राम मंदिर होणारच, असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. श्रीरामपूरमधील शिवसेनेच्या शेतकरी संवाद मेळाव्यात मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे यांची उपस्थिती होती. यावेळीशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी निवेदन स्वीकारले. तसेच शेतकऱ्यांना प्रातनिधिक स्वरुपात मोफत बियाणे वाटप केले.    

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यातील दुष्काळी भागाचा पाहाणी दौरा करत आहेत. आज उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यासाठी त्यांचं शिर्डीत आगमन झाले. साईबाबांच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.  उद्धव ठाकरेंसह मंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.