संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत, राज्यातील पहिला प्रयोग

 संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाला आहे.

Updated: Jul 29, 2020, 09:43 AM IST
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत, राज्यातील पहिला प्रयोग title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचा धोका वाढत आहे. तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्हीची गरज ओळख सिंधुदुर्गमध्ये संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाला आहे.

या उपक्रमाचे कौतुक असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. जिल्ह्यातील सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे  मंगळावीर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये उपस्थित होते. तर आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या सह सर्व नगराध्यक्ष, पोलीस ठाण्याचे प्रमुख हे ऑनलाईन उपस्थित होते.

जिल्ह्याचे आजी आणि माजी दोन्ही पालकमंत्री  यांनी चांगले काम केले असल्याचे सांगून गृहमंत्री म्हणाले, गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे हे उपयुक्त आहेत . सध्याच्या कोरोनाच्या काळा जिल्ह्यातील पोलीस दल, महसूल यंत्रणा आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. त्यांच्या कामाचे मला कौतुक असल्याचेही  अनिल देशमुख म्हणाले.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, डीपीडीसीमधून मिळालेल्या निधीचा सदुपयोग जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. ही यंत्रणा जिल्ह्यासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासोबतच यामुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे. आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचेही सांगितले. आमदार नितेश राणे यांनीही यावेळी पोलीस दलाचे अभिनंदन केले. अशा चांगल्या कामांमध्ये सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचेवळी जिल्हाधिकारी म्हणाले, या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील महिला अधिक सुरक्षित होतील.