'...तेव्हा सारं काही एका मिनिटात सरळ होईल'; नितीन गडकरींचं मतदारांना जाहीर आवाहन

Nitin Gadkari Speech In Nagpur: नागपुरमधील श्री विश्वव्याख्यानमाला कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी सर्व मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी घराणेशाहीवर बोलताना हे आवाहन केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 21, 2024, 12:05 PM IST
'...तेव्हा सारं काही एका मिनिटात सरळ होईल'; नितीन गडकरींचं मतदारांना जाहीर आवाहन title=
नागपूरमधील कार्यक्रमात गडकरी बोलत होते (फाइल फोटो)

Nitin Gadkari Speech In Nagpur: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी राजकारणातील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी नागपुरमधील श्री विश्वव्याख्यानमाला कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी राजकीय घराणेशाहीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. अनेक नेते आपल्या पत्नीसाठी तसेच मुलांसाठी तिकीटं मागतात असा दावा करत गडकरींनी नाराजी व्यक्त करतानाच मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

ज्या दिवशी लोक ठरवतील की...

राजकीय नेते मंडळी कशाप्रकारे आपल्या घरच्या व्यक्तींसाठीच तिकीटं मागतात याबद्दल गडकरींनी भाष्य केलं. "आपल्या संस्कृतीत कुठेच असं म्हटलं नाही की माझं कल्याण करा. माझ्या पोरांचं कल्याण करा. राजकारणात असे काही जण म्हणतात की माझ्या पोराचं कल्याण करा त्याला तिकीट द्या. बाकी काही झालं तरी चालेल माझ्या पोराला अगोदर तिकीट द्या. बायकोला तिकीट द्या. हे का चालतं? कारण लोक त्यांना मत देतात. ज्या दिवशी लोक ठरवतील की वारसा हक्काने आलेल्यांना आम्ही मतदान करणार नाही त्यादिवशी एका मिनिटात सारं काही सरळ झाल्याशिवाय राहणार नाही," असं गडकरी आपल्या भाषणात म्हणाले. "कोणाचा मुलगा, मुलगी होणं कोणाचे पुण्याई नाही आणि कुणाचे पापही नाही. प्रत्येकाने स्वत:ला सिद्ध केलं पाहिजे," असंही नितीन गडकरी म्हणाले.

नक्की वाचा >> 'कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत...'; गडकरींचं सूचक विधान

विचारभिन्नता ही समस्या नाही तर...

"आज-काल राजकारणात जे होत आहे तसे सगळीकडे सुरू आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाये वैसा म्हणजे स्वतःचं अस्तित्व नाही असं सुरू आहे. आपल्या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही तर विचारशून्यता ही समस्या आहे," असं परखड मत नितीन गडकरींनी व्यक्त केलं. 

नक्की वाचा >> ₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, 'तुम्ही कार..'

मतभिन्नता असली तरी चालेल पण...

दरम्यान, नितीन गडकरींनीच पुण्यातील एमआयटीमध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये लोकशाहीसंदर्भात बोलताना, "मतभिन्नता असली तरी चालेल पण मनभेद नसावे," असंही म्हटलं. "ज्या धर्मावर ज्या परमेश्वरावर विश्वास असेल त्याच्यावर विश्वास ठेवा. पसायदानाचा अर्थ म्हणजे विश्वाचे कल्याण हो असा आहे. मूलभूत तत्त्वांमध्ये कुठल्याही धर्माच्या ग्रंथामध्ये वेगळेपणा नाही. सगळ्या धर्माच्या ग्रंथांमध्ये सगळं कमी जास्त असेल पण सगळं सारखं आहे," असं गडकरी म्हणाले.