Maharastra Politics : शिंदे गटाच्या 13 खासदारांचं भवितव्य धोक्यात? भाजपच्या अहवालाने शिंदे गटाला टेन्शन

BJP surey Report Lok Sabha Election : महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचं महायुतीचं लक्ष्य आहे. दोघात तिसरा आल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे. मात्र, त्यामुळं जागावाटपाचा पेच वाढलाय, हे देखील तितकंच खरं..

सौरभ तळेकर | Updated: Nov 21, 2023, 09:26 PM IST
Maharastra Politics : शिंदे गटाच्या 13 खासदारांचं भवितव्य धोक्यात? भाजपच्या अहवालाने शिंदे गटाला टेन्शन title=
BJP surey Report, Lok Sabha,13 MPs of Shinde group

Maharastra 13 MPs of Shinde group : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडली. त्यावेळी शिवसेनेच्या विद्यमान १३ खासदारांनी (13 MPs of Shinde group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या सर्वच्या सर्व १३ खासदारांना तयारीला लागल्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. मात्र, भाजपनं मध्यंतरी केलेल्या सर्व्हेमुळं (BJP surey Report) शिंदे गटाच्या खासदारांचं टेन्शन वाढलंय. नेमका हा अहवाल काय आहे? आणि त्याचा परिणाम काय होणार पाहुया...

भाजपचा अहवाल, शिंदे गटाला टेन्शन

महाराष्ट्रात महायुतीची कामगिरी कशी सुधारता येईल, याबाबतचा हा अहवाल आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील कारभाराला महाराष्ट्रात पोषक वातावरण आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या 5 ते 8 खासदारांऐवजी नवे चेहरे द्यावे लागतील. अँटी इन्कम्बन्सीचा फटका टाळण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असा भाजपचा अहवाल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं शिंदे गटाच्या काही खासदारांचा पत्ता कापला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.

शिवसेना शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 13 खासदार लोकसभा मैदानात उतरणार असल्याचा ठाम दावा रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांनी केलाय. नागपूर अधिवेशनानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जागावाटप करावं लागणाराय.. राष्ट्रवादीच्या ४ खासदारांव्यतिरिक्त आणखी ५ जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याचं समजतंय.

आणखी वाचा - Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नवा कायदा? ओबीसीतून मराठा आरक्षण नाहीच?

महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचं महायुतीचं लक्ष्य आहे. दोघात तिसरा आल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे. मात्र, त्यामुळं जागावाटपाचा पेच वाढलाय, हे देखील तितकंच खरं.. जागावाटपाचा तिढा सोडवताना महायुतीच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष घेण्यात आली. या सुनावणीत दोन्ही गटांच्या वतीने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले, तर आज झालेल्या युक्तिवादावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.