पाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?

राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

Updated: May 21, 2019, 11:56 PM IST
पाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी? title=

मुंबई : एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण आणि मुंबई येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला मोठा फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.

कोकण आणि मुंबई या विभागात एकूण १२ मतदारसंघ येतात. यात शिवसेना ५, भाजप ४, काँग्रेस १, राष्ट्रवादी १ आणि बविआ १ अशा जागा जिंगण्याची शक्यता आहे. मात्र युतीच्या आणखी दोन जागा कमी होण्याचा धोकाही आहे. या जागा काँग्रेस आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीला फटका बसण्याची शक्यता आहे. कोकणात भाजपचा उमेदवार नाही. मात्र, मुंबईत भाजपला यश मिळताना दिसत आहे. मात्र, पालघर जागा भाजपने जिंकली होती. पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारली. मात्र, युती झाल्यानंतर ही जागा भाजपने शिवसेनेला सोडली. मात्र ही जागा शिवसेनेला राखता येणार नाही, असे चित्र दिसून येत आहे. ही जागा बहुजन विकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेस आघाडीने बविआला पाठिंबा दिला आहे. याचा फटका युतीला बसतो आहे. तसेच रायगडमध्येही सेनेला फटका बसताना दिसत आहे. येथे राष्ट्रवादी जम बसविणार असे दिसत आहे. तर रत्नागिरी शिवसेनेच विद्यमान खासदार विनायक राऊत जिंकण्याची शक्यता आहे. मराहाष्ट्र स्वाभिमानचे नीलेश राणे यांना पराभवाचा धक्का बसणार आहे.

ठाणे, कल्याण आणि भिवंडी या मतदारांचा विचार करता या जागा भाजप - शिवसेना युतीकडे कायम राहण्याची शक्यता आहे. भिवंडीत भाजप आणि ठाणे - कल्याण या दोन्ही ठिकाणी शिवसेना पुन्हा बाजी मारताना दिसत आहे. तर मुंबईत शिवसेनेलाच फटका बसताना दिसत आहे. भाजपने आपली कामगिरी चांगली केल्याचे दिसत आहे. दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे मिलिंद देवरा जिंकण्याची शक्यता असून शिवसेनेचे अरविंद सावंत यांना पराभवाचा सामना पत्करावा लागणार आहे. तर दक्षिण मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे जिंकतील तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना पराभूत होण्याचा धोका जास्त आहे.

उत्तर मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन पुन्हा जिंकण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसकडून प्रिया दत्त पराभवाच्या छायेत दिसत आहेत. उत्तर पूर्व मुंबईत भाजपने येथे भाकरी फिरवली आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. ते जिंकण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांनी जोरदार टक्कर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जरी भाजपला कौल मिळत असला तरी कोटक यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. ते २३ मे रोजीच स्पष्ट होईल.

उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेच गजानन किर्तीकर हे विजयी होतील तर काँग्रेसचे संजय निरुपम यांना पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाळ शेट्टी यांना काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार टक्कर दिली आहे. येथे काहीही होऊ शकते, अशी शक्यता आहे. मात्र, गोपाळ शेट्टी यांचे पारडे अधिक उजवे दिसत आहेत. त्यामुळे तेच जिंकू शकतात, असेच दिसून येत आहे. त्यांनी आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी २००० किलोच्या मिठाईची ऑडरही दिली आहे. त्यांनी विजयासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

ठाणे येथे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात लढाई होत आहे. मात्र, राजन विचारे पुन्हा बाजी मारु शकतात, असे चित्र आहे. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात लढत होत आहे. मात्र, शिकलेला उमेदवार हवा की न शिकलेला, असा प्रचार करत शिवसेनेने आक्रमक प्रचार केला. तर भिवंडीत भाजपचे कपिल पाटील जिंकण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना पराभव चाखावा लागू शकतो.पालघरमध्ये बविआचे बळीराम जाधव जिंकण्याची जास्त शक्ता आहे. तर शिवसेनेचे राजेंद्र गावित हरण्याची शक्यता आहे.