५० टक्के फॉर्म्युलानुसारच युती होईल - संजय राऊत

शिवसेना - भाजप यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated: Sep 19, 2019, 12:58 PM IST
५० टक्के फॉर्म्युलानुसारच युती होईल - संजय राऊत title=
संग्रहित छाया

मुंबई : शिवसेना - भाजप यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला ५० टक्के फॉर्म्युला ठरल्याची आठवण करून दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष या फॉर्म्युलावर सहमती झाल्याची आठवण करून दिली. ५० टक्के फॉ़र्म्युलानुसारच युती होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, युती होणारच, असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. महाजनादेश यात्रेला प्रचंड यश मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान आज येत असल्याने आणखी जास्त यश मिळेल, अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. तर दुसरीकडे युतीची बोलणी उद्यापासून सुरु होतील, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, उद्या शेवटची भाजपची मेगाभरती असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यानंतर युतीची बोलणी पुढे होतील, अशी शक्यता आहे.

युतीची बोलणी सुरू होत असल्याचं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. नारायण राणे भाजपमध्ये येणार की नाही हे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटीलच सांगू शकतील. आजची सभा खूप मोठी होईल, नाशिकमध्ये कधी झाली नाही एवढी मोठी सभा होईल. अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिली आहे. 

तसेच युवा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी युतीवर वेळोवेळी भाष्य केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने सर्वच्या सर्व २८८ जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घ्यातल्या आहेत. जागावाटपाबाबत भाजपशी सध्या बोलणी सुरू नसल्याने २८८ जागा लढवण्यासाठी शिवसेनेने चाचपणी सुरू केली. मातोश्रीवर रविवारी दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या.