भाजप फुटण्याच्या भीतीनं राज्यपालांनी नाकारली वेळ, नाना पटोले यांचा आरोप

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्याने वाद पेटण्याची चिन्ह

Updated: Aug 26, 2021, 09:37 PM IST
भाजप फुटण्याच्या भीतीनं राज्यपालांनी नाकारली वेळ, नाना पटोले यांचा आरोप  title=

मुंबई : विधान परिषदेवरील प्रलंबित 12 सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र ही भेट रद्द करण्यात आली. तर अशी कोणतीची वेळ मागितली नाही, असा दावा राजभवनाकडून करण्यात आला आहे.

आता यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) नव्याने वाद पेटण्याची चिन्ह आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपमध्ये मोठी फूट पडणार आहे त्यासाठी आमच्या 12 आमदारांचा नाव थांबवली आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.  

हायकोर्टाने आदेश दिला आहे की, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी एकत्र बसून यावर तोडगा काढावा. पण, राज्यपाल हे दिल्लीला गेले, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी हा निर्णय घेतला नसून त्यांच्यावर दबाव आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

भाजप सातत्याने सरकार पाडायच्या बाता करत आहे. त्यांना या 12 जागांवर आपले लोक बसवायचे आहेत. त्यामुळे भाजप हा डाव राज्यपालांच्या माध्यमातून खेळत आहे, असा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केलाय

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेट देण्याची मागणी करणारं पत्र दिलं आहे.