Mumbai Drug Case : 'आर्यन खानशी कोणताही संबंध नाही, नवाब मलिक यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार'

एनसीबीने मोहित कम्बोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवाला ताब्यात घेतलं होतं असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे

Updated: Oct 9, 2021, 05:18 PM IST
Mumbai Drug Case : 'आर्यन खानशी कोणताही संबंध नाही, नवाब मलिक यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार' title=

मुंबई : Mumbai Drug Case : ड्रग्ज पार्टीतून (Drug Party) एनसीबीने (NCB) 10 लोकांना पकडले होते. त्यातील काहींना सोडले. यात भाजपच्या (BJP) नेत्याचा मेहुणा होता, असा दावा अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. ऋषभ सचदेव, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या कॉल रेकॉर्डची मागणी करत त्यांना ताब्यात घेतल्यानंतरही त्यांच्या ताबडतोब सुटकेच्या मागे कोण होते, ते जाहीर करावे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. यातील सचदेवा हा भाजपचे नेते मोहित भारतीय याचा मेहुणा असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

आर्यन खानशी काहीही संबंध नाही

नवाब मलिक यांच्या आरोपांवर मोहित भारतीय यांनी उत्तर दिलं आहे. एनसीबी कारवाईत भाजपचा हात आहे असा मलिक यांनी आरोप केलाय, मी सध्या  भाजपचा सक्रीय कार्यकर्ता नाही. गेल्या एक वर्षापासून भाजपात सक्रीय नाही, असं मोहित भारतीय यांनी म्हटलं आहे. तसंच ऋषभ सचदेव माझा मेव्हणा आहे. मात्र त्याचा आर्यन खानशी (Aryan Khan) कोणताही संबंध नाही. तो कुठलाही व्यसन करत नाही. त्याबद्दल मला त्याचा गर्व आहे असं प्रत्युत्तर मोहित भारतीय यांनी दिलं आहे.

जावयाचा बदला घेण्याचा प्रयत्न

नवाब मलिक हे त्यांच्या जावयाचा बदला घेण्याचा प्रयत्न करत असून ते हवेत बाण मारत आहेत असा आरोपही मोहित भारतीय यांनी केला आहे. नवाब मलिक अनिल देशमुख बद्ल आणि भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ऋषभ सचदेवची ब्लड टेस्ट करु शकता NCB च्या कारवाईला मी पाठिबा देत आहे, असं मोहित भारतीय यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांवर दावा ठोकणार

नवाब मलिकांवर 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं मोहित भारतीय यांनी म्हटलं आहे. माझे आणि ऋषभचे मोबाईल कॉल डिटेल्स चेक करा मला काहीच हरकत नाही, जेव्हा आर्यन ला पकडलं तेव्हा इतर अनेक जणांना चौकशीसाठी थांबवण्यात आलं त्यातच ऋषभ होता, ज्यांच्याकडे काहीच मिळालं नाही त्यांना सोडण्यात आलं अशी माहिती मोहित यांनी दिली. ऋषभचे वडील, परिवार एनसीबी कार्यालयात आले कारण ऋषभचा फोन लागला नाही म्हणून त्यांना काळजी वाटली आणि ते आले. मात्र त्यांना ऑफिसमध्ये घेतलंच नव्हतं ते खाली पायऱ्यांवर बसले होते असं मोहित भारतीय यांनी स्पष्ट केलं.