कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक

कोरोनाची (Coronavirus) राज्यातली वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज वर्षावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  

Updated: Feb 16, 2021, 06:57 AM IST
कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक  title=

मुंबई : कोरोनाची (Coronavirus) राज्यातली वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज वर्षावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. व्हिडोओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार्‍या या बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत. 

कोरोना रूग्णसंख्या पुन्हा वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचे काही निर्बंध लादले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आजची बैठक महत्त्वाची आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही योग्य ती खबरदारी घेतली नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते, असे संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याचीच उत्सुकता लागली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा काल एकाच दिवसांत चार हजारापेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे प्रशासन काही कठोर पावले उचलण्याच्या विचारात दिसून ये आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसा सूचक इशारा देखील दिला. लॉकडाऊनबाबत नागिरकांनी मानसिकता तयार ठेवावी, असे देखील अजित पवार म्हणाले होते.

जगात अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यांना लॉकडाउन करावे लागले आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तर काय करायचे, यावर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी कोरोनाबाबतचे नियम पाळले जात नाही. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.