लॉकडाऊन संपल्यानतर आर्थिक संकट, अर्थव्यवस्थेवर परिणाम - शरद पवार

 लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे.  

Updated: Apr 30, 2020, 12:30 PM IST
लॉकडाऊन संपल्यानतर आर्थिक संकट, अर्थव्यवस्थेवर परिणाम - शरद पवार title=

मुंबई : कोरोना संकटाची मोठी झळ ही अर्थव्यवस्थेला बसली आहे. कारण लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्र आणि शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे, असे ते म्हणालेत.

जरी आर्थिक संकट ओढावणार असले तरी यावर तोडगा काढण्याची गरज आहे. देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभे राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे. लॉकडाऊनमुळे ४० दिवसांपासून सगळे काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारचा २०२०-२०२१ चा जो अर्थसंलकल्प सादर केला होता, त्यात एकंदर राज्याचे महसूल उत्पन्न तीन लक्ष ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल, असे चित्र दिसत होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आज सुधारित  माहिती घेतली असता महसूलात तूट पडेल असे दिसत असल्याची चिंता व्यक्त केली.

ही महसूली तूट १ लक्ष ४० हजार कोटी इतकी असेल. याचा अर्थ एकूण येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम सरकारच्या कामावर झाल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक संकट उभं राहणार आहे. मी पंतप्रधन मोदी यांना यासंबंधी कल्पना दिली आहे. देशाच्या सगळ्या भागांवर हे आर्थिक संकट आहे. आपण सगळ्यांनी यावर चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

सध्या मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक मालेगाव, औरंगाबाद येथे कोरोनाचा फैलाव जास्त आहे. खासकरुन मुंबई, पुण्यात जास्ता प्रभाव दिसत आहे. मुंबई, पुण्यात बहुसंख्य भाग दाटीवाटीचे आहेत. इच्छा असूनही लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळता येत नाही. म्हणून मुंबई पुण्यात संख्या जास्त आहे. असे असले तरी महापालिका, शासकीय यंत्रणेने कार्यक्रम हाती घेतला असला तरी ही संख्या वाढत आहे. सर्व कोरोनाचे रुग्ण असतात असे नाहीत. एकंदर आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी आपण घेत आहोत, असे सांगून ते म्हणाले सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. गरज असेल तर बाहेर पडा अन्यथा घरीच राहा, असे आवाहन केले.