कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल प्रणालीचा वापर

महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. रुग्णांची संख्या ५००च्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 4, 2020, 09:10 AM IST
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल प्रणालीचा वापर title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. रुग्णांची संख्या ५००च्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. आता राज्यात ४९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ५० रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत. मात्र, कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोरोनाची लक्षण स्वत:च पाहण्यासाठी नवी प्रणाली विकसित केली आहे. राज्य सरकारने कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करायला सुरुवात केली आहे.

 

या प्रणालीनुसार नागरिक घरी बसल्या आपल्या लक्षणांचे मूल्यमापन करुन प्रशासनाला कळवू शकतात, त्यानुसार त्या नागरिकाला त्याच्या प्रकृती संदर्भात माहिती दिली जाईल, असे राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. राज्य सरकारने अपोलो रुग्णालयाच्या मदतीन ही डिजिटल प्रणाली सुरु केली आहे. covid-19.maharashtra.gov.in/, या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना आपल्या लक्षणाची नोंदणी करायची आहे.

कोविड१९ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानुसार त्या नागरिकाला लगेचच वैद्यकीय मदत  दिली जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये, याची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या प्रणालीमुळे राज्य सरकारला  कोरोनाबाबत राज्यातल्या स्थितीवर लक्ष ठेवायला मदत होईल. तसेच या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून डॉक्टरांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी राज्य सरकार फोन अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही सुरु करण्याचा  प्रयत्न करत आहे. जेणेकरुन आपण सगळे कोरोनावर मात करु. तसेच कोणीही लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडू नये. स्वत:बरोबर दुसऱ्यांची काळीज घ्या, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.