'फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट'

भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे.

Updated: May 20, 2020, 05:25 PM IST
'फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट' title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. त्यांनी बुधवारी 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार आगपाखड केली. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा दिलेला सल्ला या कटाचा भाग असल्याचा दावा थोरात यांनी केला.

भाजपकडून २२ तारखेला 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनाची हाक

एकीकडे भाजपचे नेते राजकारण करायचे नाही, म्हणून सांगतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.आज राज्यावर संकट आले असताना त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पाहत आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे. 'महाराष्ट्र बचाव' नव्हे तर 'भाजप बचाव' अशी त्यांची भूमिका असल्याची टीका थोरात यांनी केली. 

उद्धव ठाकरेंनी महाआघाडी तोडावी अन्यथा...सुब्रमण्यम स्वामींचा इशारा

तत्पूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी येत्या २२ तारखेला भाजप 'महाराष्ट्र बचाव' करणार असल्याचे सांगितले. कोरोना राज्यात येऊन ६० दिवस उलटले. तरीदेखील राज्य सरकारने काहीच केलेले नाही. त्यामुळे आम्ही २२ तारखेला महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन सरकारला जाब विचारणार आहोत. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता जनतेने हे आंदोलन करून नागरिकांनीही आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले.