Jitendra Awhad : विनयभंग प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा

रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता 

Updated: Nov 15, 2022, 03:34 PM IST
Jitendra Awhad : विनयभंग प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेतली असून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने जामीन मंजूर करताना या प्रकरणाची चौकशी सुरु असणार आहे असे म्हटले आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं?

मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचा लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड  देखील उपस्थित होते. त्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना रिदा त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाजूला हो, असे म्हणत ढकलले असा आरोप रिदा रशिद यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.