लॉकडाऊन : राज्यात आतापर्यंत ३३३ गुन्हे, ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

Updated: May 1, 2020, 07:01 AM IST
लॉकडाऊन : राज्यात आतापर्यंत ३३३ गुन्हे, ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान title=

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात आतापर्यंत ३३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १५२ लोकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान राहा, अन्यथा फसवणूक होण्याचा धोका जास्त आहे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

वेबसाईटची खातरजमा करा 

सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे व नागरिक ऑनलाईन शॉपिंग करत असल्यामुळे, इंटरनेटवर अनेक संकेतस्थळ (website) सुरु झाल्या आहेत. ज्या आपण परदेशातील महागड्या ब्रँड्सचे वितरक आहोत अशा आशयाचा दावा आपल्या संकेतस्थळावर (website)जाहीरपणे करतात. अशा लिंक्सवरून काही खरेदी करताना सावध राहा, सायबर भामट्यांनी फसविण्यासाठी तयार केलेली ती नकली (fake) वेबसाईटसुद्धा असू शकते, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कृपया अशी एखादी वेबसाईट तुमच्या पाहण्यात आली तर आधी खातरजमा करून घ्या. मगच त्यावर ऑनलाईन खरेदी करा आणि कुठेही आपल्या बँक खात्याची सर्व माहिती तसेच डेबिट, क्रेडिट कार्ड पिन नंबर देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

समाज माध्यमांवर गैरप्रकार

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर आणि अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारासंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ३३३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी १३ गुन्हे अदखलपात्र (N.C)आहेत. तसेच सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय गुन्हे

बीड - २९, पुणे ग्रामीण - २७, जळगाव - २६, मुंबई - २०, कोल्हापूर -१६, सांगली -१२, नाशिक ग्रामीण - १२, नाशिक शहर - ११, जालना - ११, सातारा - १०, बुलढाणा - १०, लातूर - १०, नांदेड - ९, पालघर - ९, ठाणे शहर - ८,परभणी - ८, सिंधुदुर्ग - ७, नवी मुंबई - ७, अमरावती - ७, ठाणे ग्रामीण - ७, हिंगोली - ६, नागपूर शहर - ६, गोंदिया - ५, सोलापूर ग्रामीण - ५, पुणे शहर - ४, रत्नागिरी - ४ ,सोलापूर शहर - ४, नागपूर ग्रामीण - ४, भंडारा - ३, चंद्रपूर - ३, पिंपरी- चिंचवड - ३,रायगड - २, धुळे - २, वाशिम - २, औरंगाबाद -१ (एन.सी), यवतमाळ -१ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या गुन्ह्यांमध्ये आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १३८ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १२५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत , टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी १० गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत १५२ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी ६० आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश आले आहे .

दरम्यान, पुणे ग्रामीणमध्ये लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. एका महिलेने आपल्या फेसबुक पोस्टवर कोरोना महामारीबाबत चुकीची माहिती असणारी व अफवा पसरविणारी पोस्ट शेअर केली होती.