कोरोनाचे संकट : विलगीकरण केंद्रातून पळून जाणाऱ्यांची खैर नाही, होणार कडक कारवाई

कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यात विलगीकरण केंद्रातून काही जण पळून जात आहेत. 

Updated: Mar 19, 2020, 07:15 PM IST
कोरोनाचे संकट : विलगीकरण केंद्रातून पळून जाणाऱ्यांची खैर नाही, होणार कडक कारवाई title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, कोरोनाचे जे संशयित आहेत, त्यांना कोरोना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे. मात्र, विलगीकरण केंद्रातून काही जण पळून जात आहेत. याबाबत राज्य शासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. आता यापुढे कोणीही पळून गेला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांनी दिले आहेत.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. नव्याने रुग्णांचे भर पडत आहे. देशात प्रथम क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे खूप काळजी घेण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी काही एसटी बस, रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे खूप खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचवेळी संशयित कोरोना रुग्णांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे.

मात्र, विलगीकरण केंद्रातून रुग्ण पळून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा रुग्णांवर आता साथीचे रोग अधिनियमान्वये कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या आदेशाचे पालन करती असे कोणी पळून गेले तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रातून पळून जाणाऱ्यांवर "साथीचे रोग अधिनियमान्वये" कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पोलिसांना दिले आहेत. देशमुख यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यात कोरोना विषाणूंचा होणारा फैलाव रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालय, कार्यालयात ५० टक्के उपस्थिती, दुकाने, मॉल, बार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने कडक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विलगीकरण कक्षातून पळ काढणाऱ्यांवर साथीचे रोग अधिनियमान्वये कारवाई करण्यात येणार आहे. विलगीकरण कक्षातील रुग्ण बुधवारी पालघर लोकलमधून प्रवास करत होते. सहा जण गुजरातला जात असलेल्या रेल्वेतून ताब्यात घेण्यात आले. पळून जाणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकार आणि पोलिसांकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.