'पवारांना कधीच बहुमत मिळवता आलं नाही' दिलीप वळसे-पाटील यांचा थेट हल्ला.. शरद पवार गट आक्रमक

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.. त्यावरून आता वळसे पाटलांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. पवारांबद्दल कधीही चुकीचं बोललं जाणार नाही, शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल वळसे पाटलांकडून दिलगिरी मागितली आहे. शरद पवार गटाकडून मुंबईत जोडो मारो आंदोलन करण्यात आलं.

राजीव कासले | Updated: Aug 21, 2023, 08:03 PM IST
'पवारांना कधीच बहुमत मिळवता आलं नाही' दिलीप वळसे-पाटील यांचा थेट हल्ला.. शरद पवार गट आक्रमक title=

Maharshtra Politics : शरद पवार (Sharad Pawar) हेच आमचे गुरू असल्याचं सांगणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) आता पवारांवरच थेट हल्लाबोल करण्यात आला आहे. हा हल्लाबोल केलाय पवारांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि पवारांच्या वर्गातले हुशार विद्यार्थी समजल्या जाणाऱ्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी. मंचरमध्ये जाहीर कार्यक्रमात बोलताना सहकारमंत्री वळसेंनी पवारांची राजकीय उंचीच काढली. पवारांना जनतेनं एकदाही बहुमत दिलं नाही. ते एकट्याच्या ताकदीवर कधीच मुख्यमंत्री बनवू शकले नाहीत, असा शालजोडीतला टोला दिलीप वळसे पाटील यांनी लगावला. 

सौम्य आणि मृदू स्वभाव अशी ओळख असलेल्या वळसेंनीच आपल्या राजकीय गुरूवर ही टीका केल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये (Sharad Pawar Group) संतापाची भावना पसरलीय. राष्ट्रवादी मुख्यालयाबाहेर (NCP HeadQuarter) वळसेंच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं कृतघ्न वळसे पाटलांना महाराष्ट्र (Maharashtra) कधीच क्षमा करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) व्यक्त केली.

दिलीप वळसे-पाटील हे शरद पवारांचे सर्वात लाडके,  शरद पवारांच्या वर्गातील हुशार विद्यार्थी. पण हा विद्यार्थी नागपंचमीच्या दिवशीच बोलला. माणूस किती कृतघ्न असा याचं आश्चर्य वाटतं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. 

दरम्यान, या वादानंतर वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) काहीशी नमती भूमिका घेतली. आपण पवारांवर टीका केली नाही, तर मनातली खंत बोलून दाखवली, अशी सारवासारव त्यांनी केली. इतका मोठा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेने ज्या खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभं राहिला पाहिजे होतं ते घडलं नाही, आणि त्याच्याबद्दलची खंत माझ्या मनता होती. ती खंत मी बोलून दाखवली. शरद पवार यांच्याबद्दल माझ्या तोंडून कधीही, कोणताही चुकीची शब्द, कोणत्याही प्रकराची टीका करणं, शक्य नाही. तरीही हा जो गैरसमज झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं दिलीप वळसे-पाटील  यांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी सिनिअर पवारांवर पहिली टीकेची तोफ डागली. त्यानंतर छगन भुजबळांनी... आणि आता दिलीप वळसे पाटलांनी...पवारच दैवत असल्याचं म्हणणा-या अजित पवार गटाच्या नेत्यांनी पवार सोबत न येण्यावर ठाम असल्यामुळे विरोधक म्हणून हळू हळू हल्ले करायला सुरूवात तर केली नाही ना ? अशी चर्चा आता रंगतेय.