पालकांनो, चिमुकल्यांना सांभाळा, गोवर होऊन गेलेल्यांना सर्दी, तापाचा धोका

गोवरचा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेचा Action Plan, दीड लाख बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्याचा निर्धार 

Updated: Nov 27, 2022, 03:02 PM IST
पालकांनो, चिमुकल्यांना सांभाळा, गोवर होऊन गेलेल्यांना सर्दी, तापाचा धोका title=

Measles Outbreak in Mumbai : मुंबईस राज्यात काही ठिकाणी गोवर (Measles) धोका वाढलाय. गोवरमधून बरं झाल्यानंतरही एक महिन्यापर्यंत धोका कायम असतो असा इशारा मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलाय. गोवरची लागण झालेलं बाळ बरं झाले तरी पुढील साधारण एक महिना त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. या महिनाभरात त्याला अन्य आजारांची लागण होण्याची शक्यता आहे, असा इशारा मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलाय. 

गोवरमधून बरे झालेल्या बाळांना पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसमोर गोवर रुग्णांबरोबरच त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झालंय.

या बाळांना अधिक धोका
लसीकरण न झालेल्या, रक्तक्षय आणि कुपोषित असलेल्या बालकांना गोवरची लागण होण्याचे प्रमाण अधिक असते. या आजाराची लागण झाल्यानंतर बाळाची प्रतिकारशक्ती कमी होते. औषधोपचाराने बाळ बरे झाले तरी त्याची प्रतिकारशक्ती लगेचच पूर्ववत होत नाही. यासाठी साधारणपणे महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे गोवरमधून बरे झालेल्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला तसच अन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. बरे झालेल्या रुग्णांची साधारणपणे किमान एक महिना काळजी घेणं आवश्यक आहे. या कालावधीमध्ये बाळाकडे किंवा त्याच्या पोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास त्याला इतर आजार होण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लान
मुंबईतला गोवरचा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेने जोरदार तयारी केलीय. मुंबईत जवळपास दीड लाख बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्याचा निर्धार बीएमसीने (BMC) केलाय. त्यासाठी बीएमसीने दीड लाख मुलांच्या नावांची यादीच तयार केलीय. राज्य सरकारकडून परवानगी आल्यावर बीएमसीने तातडीने ही यादी तयार केलीय. जिल्हापातळीवर टास्कफोर्स तयार करून गोवरच्या स्थितीचा सतत आढावा घेतला जाईल. मुंबईत दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये गोवरचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या भागांमध्ये बीएमसी अतिरिक्त लसीकरण (Vaccination) करण्याची शक्यता आहे. सोमवारपासूनच ही मोहीम सुरू करण्याचे बीएमसीचे प्रयत्न आहेत. 

गोवर रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर
गोवर रोखण्यासाठी भिवंडीत (Bhiwandi) क्वारंटाईन सेंटर (Quarantine Centre) सुरू करण्यात आलंय. मुंबई पाठोपाठ गोवरचे सर्वाधिक बळी भिवंडीत गेलेत. भिवंडी शहरात गोवरची साखळी तोडण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे. गोवर क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आलीय. संवेदनशील भागात विशेष कॅम्प घेण्यात येणार आहेत. आयसोलेशन सेंटरसोबतच (Isolation Centre) कोरोनाच्या धर्तीवर वॉर रूम (War Room) स्थापन करण्यात येणार आहे.