गुड न्यूज! वाशिंदपुढील लोकल प्रवासाला गती येणार, प्रवाशांचे 2 तास वाचणार

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलची लाइफलाइन आहे. प्रवाशांचा वाशिंदपुढचा प्रवास वेगाने होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 7, 2024, 11:14 AM IST
गुड न्यूज! वाशिंदपुढील लोकल प्रवासाला गती येणार, प्रवाशांचे 2 तास वाचणार title=
mumbai local train central railways closes vashind local crossing gate to save passengers travel time

Mumbai Local Train Update: लोकल ही मुंबईची लाइफलाइन आहे. लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. पण काही तांत्रिक कारणांमुळं लोकलचा वेग मंदावतो आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. लोकल प्रवासातील महत्त्वाचा अडथळा म्हणजे क्रोसिंग फाटक. मुंबईतही असे अनेक फाटक आहेत. हे फाटक बंद करण्यात आल्यास लोकल वेग पकडू शकते. अलीकडेच मध्य रेल्वेने कल्याण-कसारा मार्गावरील वाशिंद स्थानकाजवळील एलसी गेट क्रमांक 64 बंद केले आहे. हे फाटक बंद झाल्यानंतर मध्य रेल्वेवर दररोज एकूण 2 ते 2.5 तासांची बचत होणार आहे.

वाशिंद स्थानकाला लागून असलेले एलसी गेट दिवसातून सरासरी 25 वेळा वाहतुकीसाठी खुले करण्यात येते. एकदा हे फाटक उघडल्यानंतर साधारण ७-8 मिनिटे खुले असते. एकदा का फाटक खुले झाल्यानंतर लोकल गाड्यांना लाल सिग्नलवर थांबावे लागते. अशा परिस्थितीत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेनमुळं सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रेनची प्रतीक्षा आणखी वाढते. वाशिंद एलसी गेटमुळे दररोज सुमारे दोन डझन लोकल गाड्यांच्या वेळेवर परिणाम होत होतो, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

गेल्या 6 महिन्यात मध्य रेल्वेने अनेक महत्त्वाचे फाटक बंद केले आहेत. कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यानचे फाटक बंद केल्याने आता प्रति लोकलमागे 20 मिनिटांचा वेळ वाचत आहे. या ठिकाणी रेल्वेने रोड ओव्हर ब्रिज अवघ्या दीड वर्षात पूर्ण केला. त्यामुळं कल्याण-विठ्ठलवाडी-उल्हासनगर हा पाच किमीचा भाग आणि उल्हासनगर- अंबरनाथ विभागाचा काही भागात फाटक ओलांडावे लागत वाही. कल्याण बदलापूर रोड आणि कुर्ला कॅम्प रोडला जोडणाऱ्या या विभागातील रस्ते वाहतुकीसाठी हे सर्वात वर्दळीचे फाटक होते. येथून वर्षाला 6.73 लाख वाहनांची ये-जा करत होते. 

रेल्वेने प्रवाशांच्या सुविधासाठी तसेच सध्याच्या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी योग्य निधीची तरतूद केली आहे. मुंबईत रेल्वे रूळांवरील अनेक पुलांची दुर्दशा झाली आहे. या पुलांची पुर्नबांधणी करणे गरजेचे आहे. रेल्वेच्या अंतरिम बजेटमध्ये अनेक स्थानकांवर पुल बांधणीसाठी निधीची तरतूद केली आहे. जेणेकरुन नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडावा लागू नये.

यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मागील वेळेच्या तुलनेत 29 टक्के अधिक रक्कम देण्यात आली आहे. रस्ते सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेसाठी 1,196 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव आहे. यातून प्रभादेवी, दादर आणि विरार-वैतरणा रोड ओव्हरब्रिजची पुनर्बांधणी करायची आहे. मध्य रेल्वेकडे रस्ते सुरक्षेसाठी 756 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव आहे. त्यात विक्रोळी आणि दिवा रेल्वे ओव्हर ब्रिज आणि दिवा-वसई, दिवा-पनवेल मार्गावर ROB प्रस्तावित आहे.