Mumbai News :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' भागातील पाणी कपात मागे

Mumbai Water Supply : पिसे जल उदंचन केंद्रातील तीन ट्रान्सफार्मर व त्या आधारे २० पंप संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती बीएससीने दिली आहे.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Mar 5, 2024, 11:11 PM IST
Mumbai News :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' भागातील पाणी कपात मागे title=
Mumbai Water Supply

Mumbai News : पिसे जल उदंचन केंद्रातील तीन ट्रान्सफार्मर व त्या आधारे २० पंप संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आल्याची  माहिती बीएससीने (BMC) दिली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील पाणीपुरवठ्यातील १५ टक्के कपात बुधवार ६ मार्च पासून मागे घेण्यात आल्याचं देखील बीएससीकडून सांगण्यात आलं आहे. ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील १५ टक्के कपात देखील मागे घेण्यात आली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या पिसे जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्ववत झाली आहे. सद्यस्थितीत तीन ट्रान्सफार्मर सुरु होवून त्या आधारे सर्व २० पंप सुरू करण्यात आले आहेत. आज तिसऱ्या ट्रान्सफार्मरवर आधारित पंपदेखील पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १५ टक्के पाणी कपात उद्या बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी आग लागल्याने यंत्रणा बाधित झाली होती. त्यामुळे मुंबई महानगरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करून टप्प्याटप्प्याने ट्रान्सफॉर्मर आणि त्यावर आधारीत पंप सुरू करण्यात आले.  

दुरूस्तीसाठी परिरक्षणाअंतर्गत असलेला तिसरा ट्रान्सफॉर्मरदेखील नुकताच सुरू झाला असून त्यावर आधारित पाच पंप चालू झाले आहेत. अशा रितीने सद्यस्थितीत पिसे केंद्रातील सर्व म्हणजे २० पैकी २० पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तसेच पिसे उदंचन केंद्रासह पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहे. 

परिणामी संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणा-या पाणीपुरवठ्यातील १५ टक्के पाणी कपात उद्या बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत आहे.