मुंबईसह राज्यभर भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल - भुजबळ

राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. कोणीही पॅनीक होऊ नये. अन्नधान्याचा पुरवठा हा सुरळीत होईल. घाबरुन जाऊ नका, खरेदीसाठी गर्दी करु नका. 

Updated: Mar 25, 2020, 11:35 PM IST
मुंबईसह राज्यभर भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल - भुजबळ title=

मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. कोणीही पॅनीक होऊ नये. अन्नधान्याचा पुरवठा हा सुरळीत होईल. घाबरुन जाऊ नका, खरेदीसाठी गर्दी करु नका. लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला,अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात असून आज मुंबईतील दादर व भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु झाले आहे. या काळात नागरिकांना भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. उद्यापासून वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे  छगन भुजबळ यांनी दिली.

शासनाच्यावतीने भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात येत असून भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना पोलिसांनी आडवू नये. त्यांना मार्गस्थ करण्यात यावे, असे आदेश छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई व नाशिक पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून माल घेऊन जाणारी आणि त्यानंतर परतणारी रिकामे वाहने पोलिसांनी तात्काळ सोडावी, असे आदेश दिले आहेत. शेतकरी आणि भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.