'राज्यसभेत आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते; उपसभापतींबद्दलचा माझा अंदाज चुकला'

राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी नियमांना बगल दिली  

Updated: Sep 22, 2020, 12:39 PM IST
'राज्यसभेत आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते; उपसभापतींबद्दलचा माझा अंदाज चुकला' title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आग्रहामुळे ही विधेयके तातडीने मंजूर करण्यात आली. त्यासाठी सदनाचे कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला. आजवर राज्यसभेत असे कधीच घडले नव्हते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी रविवारी राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी झालेल्या गोंधळासंदर्भात सविस्तरपणे भूमिका मांडली.

संसदेबाहेर रात्रभर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी सकाळी उपसभापतीच चहा आणतात तेव्हा....

 

त्यांनी म्हटले की, राज्यसभेतील विरोधी पक्षाचे खासदार उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना वारंवार नियमाचे पुस्तक दाखवत होते. पण उपसभापतींनी त्याकडे दुर्लक्ष केले. खासदार नियमाचे पुस्तक दाखवत असताना उपसभापतींनी त्यांचे ऐकायला पाहिजे होते. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत उपसभापतींनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेतले. 

उपसभापतींच्या 'गांधीगिरी'वर पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले...

उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याकडून मला अपेक्षा होत्या. मात्र, त्यांचे वागणे बघून मला धक्का बसला. उपसभापतींकडून विचारांना तिलांजली देण्याचे काम झाले, अशी टीका शरद पवार यांनी केली. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या उपसभापतींनी सभागृहात नियमांना महत्त्व दिले नाही, ते निलंबित सदस्यांना चहापान द्यायला गेले. मात्र, सदस्यांनी त्यांच्या चहापानाला हात लावला नाही, याचा आपल्याला अभिमान असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याविषयीचा आपला अंदाज सपशेल चुकल्याची कबुलीही शरद पवार यांनी दिली. तसेच निलंबित खासदारांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचेही शरद पवार यांनी जाहीर केले. 

...म्हणून मी राज्यसभेत गेलो नव्हतो- शरद पवार
राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी आपण का हजर नव्हतो, याचे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत दिले. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबद्दल मी गेले दोन दिवस राज्य सरकारशी चर्चा करत आहे. मी अनेक कायदे तज्ज्ञांबरोबरही बोललो. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर अपील करणे गरजेचे आहे. त्यासाठी मला मुंबईत थांबावे लागले आणि दिल्लीला जाता आले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.