तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? नाना पटोले यांचा सवाल

शेतकऱ्यांच्या मुद्दयावर विरोधक आक्रमक असतानाच आता काँग्रेसनेही शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे

Updated: Mar 7, 2022, 05:04 PM IST
तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? नाना पटोले यांचा सवाल title=

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्यात 2016 साली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आणि 2019 साली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पण या दोन्ही कर्जमाफी योजनांमध्ये काही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का ? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजना राबवताना दोन्ही योजनांमधून काही शेतकरी पात्र असतानाही त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची घोषणा केली होती तसंच ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी  वन टाईम सेटलमेंटचाही पर्याय दिला होता. 

यातूनही काही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळेल का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेबद्दल काही तक्रारी नाहीत आणि या कर्जमाफी योजनेचे उदिष्ट्य सरकार पूर्ण करेल असं उत्तर दिलं.