प्रेक्षागृहात केवळ तेथील उपलब्ध खाण्याच्या सक्तीविरोधात हायकोर्टात याचिका

अन्नपदार्थांची सक्ती नको तसेच घरगुती पाणी आणि अन्न घेऊन प्रवेश मिळावा याकरिता जैनेंद्र बक्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Updated: Aug 22, 2017, 01:44 PM IST
प्रेक्षागृहात केवळ तेथील उपलब्ध खाण्याच्या सक्तीविरोधात हायकोर्टात याचिका  title=

मुंबई :  स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून मुंबईसह राज्यभरात सिनेमागृहांमध्ये आणि नाट्यगृहांमध्ये प्रवेश करतानाच खाण्याचे डब्बे आणि पाण्याची बाटली बाहेर ठेवून प्रवेश दिला जातो. तसेच बाहेरून आणलेल्या पदार्थांऐवजी तेथे मिळणारेच अन्नपदार्थ खावेत अशी सक्ती असते.  

अन्नपदार्थांची सक्ती नको तसेच घरगुती पाणी आणि अन्न घेऊन प्रवेश मिळावा याकरिता जैनेंद्र बक्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

कलाकृतीचा आनंद घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश असतो. त्यांना नाईलाजास्तव या ठिकाणी मिळणारे फास्ट फूड खावे लागते. अशी तक्रार याचिकेत करण्यात आली आहे. 

फास्ट फूड खरेदीच्या सक्तीमुळे घटनेच्या कलम २१ नुसार, जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.  कोणत्याही प्रेक्षागृहात घरगुती अन्नपदार्थ घेऊन जाण्यास मनाईसाठी कायद्याचा आधार नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. 

प्रेक्षागृहातीलच अन्न खाण्याच्या सक्तीप्रमाणेच तेथे अन्नपदार्थ विक्रीला मनाई करण्यात  यावी यासाठीदेखील याचिकेत मागणी करण्यात आली आहे. पण 'ही परिस्थिती मुंबईप्रमाणेच देशभर आहे.' असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.  याप्रकरणी लवकरच सुनावणी होणं अपेक्षित आहे.